तीर्थक्षेत्रांचा दर्जा वाढविण्याबाबत परिपूर्ण प्रस्ताव सादर करा – अब्दुल सत्तार


औरंगाबाद : खुलताबाद येथील हजरत शेख मुन्तजबुद्दीन जर जरी बक्ष आणि भद्रा मारोती येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. ह्या दोन तीर्थक्षेत्रांच्या दर्जात वाढ करण्याच्या अनुषंगाने पालिकेने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा असे आवाहन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

खुलताबाद येथे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस अधिक्षक निमित गोयल, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, नगराध्यक्ष ॲड सय्यद मुकोनुद्दीन, सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे, आदी उपस्थित होते.

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी शहरातील रस्ते, पुरातन कमानी, दरवाजे यांचा आढावा घेऊन प्रशासनास शहरातील रस्ते, तसेच पुरातन दरवाजांच्या आणि कमानींच्या जतन आणि संवर्धनासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल (DPR) सादर करावा. याबाबत मंत्रालयात पर्यटन, सार्वजनिक बांधकाम आणि इतर संबंधित विभागांची बैठक घेण्यात येईल. ह्या कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.