पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील – जयंत पाटील


सांगली : पोलीस दलाचे कामकाजाचे स्वरूप विस्तारत असून त्यासाठी आधुनिक यंत्रणा, सुसज्ज कार्यालय अत्याधुनिक साधन सामुग्री असणे ही काळाची गरज झाली आहे. सांगली पोलीस दलालाही कामकाजासाठी क्षेत्र कमी पडत असल्याने नविन इमारत असणे ही आवश्यक बाब झाली होती. त्यासाठीच नविन पोलीस अधिक्षक कार्यालय निर्माण करण्यात येणार असून पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

नविन पोलीस अधिक्षक कार्यालयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते विश्रामबाग पोलीस मुख्यालय सांगली येथे संपन्न झाले. यावेळी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, कृषि व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार सर्वश्री अरूण लाड, सुधीर गाडगीळ, डॉ. सुरेश खाडे, सुमनताई पाटील, अनिल बाबर, विक्रम सावंत, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले आदि उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पोलीस दल सक्षम करण्यासाठी भर देण्यात येत असून पोलीस दलाची विश्रामबाग येथील 216 शासकीय पोलिस निवासस्थाने व आटपाडी येथील नविन पोलीस स्टेशन उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच पोलीस क्वाटर्स दुरूस्तीसाठी 1 कोटी 90 लाख इतका निधी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीमधून पोलीस दलाची गतीमानता वाढविण्यासाठी 35 बोलेरो व 61 मोटर सायकल देण्याचेही नियोजन करण्यात आले असून त्यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. नुतन पोलीस अधिक्षक कार्यालय उभारणीसाठी सुमारे 20 कोटीचा निधी देण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास वाढीव निधीही देण्यात येणार आहे.

नुतन इमारत उभारणी करताना सदरची इमारत ही मेन्टेनन्स फ्री उभारण्यावर भर द्यावा. ही इमारत सर्व सोयीसुविधेने उभारण्यात येणार असल्याने या ठिकाणाहून चांगल्या प्रकारे कारभार होवून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पोलीस दलानेही जनतेला तातडीने सेवा देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. अडचणीत असलेल्या व्यक्तीकडून अथवा कुटुंबाकडून मदतीसाठी कॉल आल्यानंतर अगदी कमीत कमी वेळेत त्या ठिकाणी पोहोचणे ही काळाची गरज झाली आहे. तरच गुन्हेगारी प्रवृत्तीला बहुतांशी आळा बसेल व पोलीस दलाचा वचक निर्माण होईल.

पोलीस दलाच्या 112 क्रमांकावर दिली जाणारी सुविधा ही अधिक जलदगतीने झाल्यास पोलीस दलाबद्दल जनतेत विश्वास निर्माण होईल व पोलीसांमध्येही आत्मविश्वास वाढेल, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली पोलीस दलाने राबविलेले उपक्रम हे आता आदर्शवत होत चालले आहेत. यामध्ये प्रामुख्याने चोरीस गेलेला मुद्देमाल अत्यंत कमी कालावधीत संबंधिताला शोध घेवून परत करणे, मृतांच्या वारसांना अनुकंपा भरती प्रक्रिया तातडीने राबविणे तसेच खाजगी कंपन्यांमध्ये पोलीसांच्या पाल्यांना चांगल्या दर्जाची नोकरी मिळवून देणे, एमआयडीसी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी तक्रार पेठीची सुविधा उपलब्ध करून देणे, तक्रार पेठीत प्राप्त झालेल्या सुचनांवर तातडीने अंमलबजावणी करणे तसेच जिल्ह्यातील व शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, महत्वाची ठिकाणे या ठिकाणी सीसीटीव्हीची नजर ठेवण्यात आली आहे.

त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानके आयएसओ मानांकन करण्यात आली आहेत. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी होताना दिसत असून हे सर्व श्रेय सांगली पोलीस दलाचे आहे. त्यामुळे सांगली पोलीस दल प्रशंसनेस पात्र आहे. पोलीस दल सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी अहोरात्र काम करते. तसेच कोरोना काळात कायदा व सुव्यवस्था अत्यंत चांगल्या पध्दतीने राबवून कोरोना फैलावण्यास अटकाव करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या कर्तव्यासाठी बऱ्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे याच पोलीस दलाप्रती आपल्या सर्वांचे हे कर्तव्य आहे की, त्यानांही आपण सहकार्य करणे तसेच त्यांचे प्रोत्साहन वाढविणे.

गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई म्हणाले, पोलीस दलामध्ये नवनविन विभाग सुरू होत असून कामकाजाचे स्वरूपही मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. त्यासाठी यंत्रणा अपुऱ्या पडत आहेत. यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने पोलीस दलाचे आधुनिकीकरण करण्यावर व अधिकच्या नविन सुविधा, इमारती उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात 450 कोटीची तरतूद करण्यात आली होती. आता यामध्ये वाढ करून ती 800 कोटी पर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्यात 1 हजार व्यक्तींच्या मागे 1 पोलीस कार्यरत असून पोलीसांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. पोलीस दलाने मुलींना स्वरक्षणार्थ सक्षम करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यावर भर दिला असून त्याची प्राथमिक सुरूवात सातारा पोलीस दलात करण्यात आली आहे. हाच प्रकल्प पुढे राज्यात विस्तारण्याचा शासनाचा मानस आहे.

सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, कोरोना सारख्या महाभयंकर महामारीच्या काळात पोलीस दलाने बजावलेले कर्तव्य हे प्रशंसनीय आहे. कोरोना काळात प्राणाची पर्वा न करता स्वत:चा जीव धोक्यात घालून शिस्त लावण्याचे काम चोखपणे बजावले आहे. त्यामुळे पोलीस दल हे यापुढेही याच पध्दतीने कायदा व सुव्यवस्थेचे काम चोखपणे पार पाडेल अशी खात्री असून सांगली जिल्हा पोलीस दलासाठी नविन इमारत आत्मविश्वास वाढविणारी असेल, असे सांगून सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी नविन इमारत उभारताना वाहनांच्या पार्किंगसाठी इमारतीच्या बाजूला सोय न करता इमारतीच्या खाली सोय करण्यात यावी. सदरची इमारत ग्रीन बिल्डींग करण्यावर भर द्यावा. इमारतीवर सोलर सिस्टीम असण्याबरोबरच पोलीस दलातील ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्राणांची आहुती देवून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले त्यांची ओळख जिल्ह्याला व्हावी यासाठी या इमारतीमध्ये म्युझियम करण्यात यावे, अशा सूचना केल्या.