शरद पवारांना अजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे मान्य आहे का?; किरीट सोमय्या


मुंबई – पवार कुटुंबावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी टीकेची तोफ डागली आहे. अजित पवार यांच्यावर त्यांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली असल्याचा आरोप केला आहे. तसेच अजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का? असा सवाल केला आहे. तसेच पवार कुटुंबातील कुणीही मी दिलेल्या पुराव्यातील एक कागदपत्र खोटा आहे, हे सिद्ध करावे, असे आव्हानही दिले आहे. त्याचबरोबर यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवरही निशाणा साधला.

किरीट सोमय्या म्हणाले, आयकर विभागाची धाड पडल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्याच दिवशी विधान केले की माझ्या बहिणी निता पाटील, विणा पाटील, मेव्हणे, मोहन पाटील यांच्या घरी आयकराच्या धाडी कशाला? त्यांचा काही आर्थिक व्यवहार नाही. माझ्याकडे पुरावे आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्यापासून अजित पवार यांच्या ७० बेनामी संपत्तीत, कंपन्यांमध्ये अजित पवारांच्या बहिणी, मेहुणे भागीदार आहेत. मग अजित पवारांनी महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेशी बेईमानी केली की आपल्या बहिणींशी बेईमानी केली?

बहिणींच्या नावाने कंपन्यांमध्ये भागिदारी आहे, संपत्ती आहे. आपण म्हणता त्यांचा काही संबंध नाही. मग बहिणींच्या नावाने देखील बेनामी संपत्ती केली का? ते शरद पवार यांना मान्य आहे का? असा थेट सवाल यावेळी किरीट सोमय्या यांनी केला. तसेच शरद पवार यांना माझे आव्हान आहे की हे सर्व आयकर विभागाला मी पाठवणार आहे. सहकार मंत्रालयाला पण पाठवणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. यातील एक पण कागद खोटा असेल तर शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी मला हे सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी पवार कुटुंबाला दिले आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी मी हे करत आहे, पण पवार परिवार महाराष्ट्राच्या जनतेला लुटण्याचे काम करत आहे. ते लुटीसाठी करतात, ती लूट जनतेसमोर ठेवण्यासाठी मी काम करतो. शरद पवार एवढे वर्ष मुख्यमंत्री राहिले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. ११ घोटाळेबाज ठाकरेंचे आता १७ झाले. ६ राखीव झाले आहेत, हे वाढत चालले आहेत. यातील एकही घोटाळा केला नसल्याची म्हणण्याची हिंमत ठाकरे-पवारांमध्ये नाही. तुम्ही मंत्री आहात, जे घोटाळे केले आहेत त्यावर बोला ना.

पोलिसांनी हे घोटाळे उघड करायला हवे, पण हे पोलिसांचा उपयोग माफिया म्हणून काम करत आहेत. पोलीसच चोरी करत आहेत, सुपारी पोलीसच घेत आहेत, पोलीस आयुक्तच गायब होतो, गृहमंत्री फरार होतो. म्हणून शेवटी जनतेने जायचे कुठे? उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, लोकायुक्त, राष्ट्रीय हरित लवाद, मानवाधिकार आयोग यांच्याकडे किरीट सोमय्या जात आहे, तर त्यात चूक काय? असेही त्यांनी नमूद केले.