पंजाबचा शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका, त्याची किंमत या देशाने मोजली आहे : शरद पवार


पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काल पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर भाष्य केले. शेतकऱ्यांचे जे आंदोलन गेल्या दहा-बारा महिन्यांपासून सुरु आहे, तिथे मी स्वतः दोन-तीनवेळा जाऊन आलो आहे. दुर्दैवाने त्या आंदोलनात सामील झालेल्या घटकाबाबत केंद्र सरकारची भूमिका सामंजस्याची असल्याचे मला दिसत नाही. त्या आंदोलनात सहभागी झालेल्यांमध्ये जास्तीत जास्त शेतकरी हे पंजाब, हरियाणा, वेस्टर्न उत्तर प्रदेश, राजस्थान येथील आहेत. त्यात ही पंजाबचाच आकडा जास्त दिसत असल्यामुळे केंद्र सरकारला आमचे सांगणे असते की, पंजाबचा शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका, असे पवारांनी म्हटले आहे.

पवारांनी पुढे म्हटले की, सीमेवरचे पंजाब हे राज्य आहे आणि आपण सीमेवरच्या बहुसंख्य शेतकऱ्यांना अस्वस्थ केले, तर त्याचे दुष्परिणाम होतात. या देशाने अशांत एकदा पंजाबची किंमत दिलेली आहे. ही किंमत अगदी इंदिरा गांधी यांच्या हत्येपर्यंत दिलेली आहे. दुसरीकडे याच पंजाबमधील सर्व शेतकऱ्यांनी अन्न पुरवठ्यासाठी प्रचंड योगदान सतत दिलेले आहे. जेव्हा या देशाच्या संरक्षणाचा विषय येतो, तेव्हा महाराष्ट्रात तुम्ही भाषणे देता. इंच-इंच लढवू म्हणता पण पंजाबच्या सीमेवरील माणूस खऱ्या अर्थाने त्याला तोंड देतो. असा त्याग करणारा घटक काही प्रश्नांसाठी आग्रह धरत असेल, तर त्याकडे राज्यकर्त्यांनी गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, ही राष्ट्रीय गरज असल्याचेही पवार म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर आपली मते मांडली. पण, यात त्यांनी चुकीचा आरोप केला. फडणवीस यांना माझी हात जोडून विनंती आहे की असे आरोप करू नका. हे योग्य नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. यावेळी केंद्र सरकार कशा पद्धतीने यंत्रणांचा चुकीचा वापर करत आहे, याचा पाढाच पवारांनी वाचून दाखवला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर आपली मते मांडली. त्यात ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. पण मी सांगतो की स्वतः सत्ता स्थापन करताना त्यात हस्तक्षेप केला होता. जेव्हा चर्चा सुरू होती की नेतृत्व कोणाकडे द्यायचे. तेव्हा उद्धव ठाकरे यांचे हात मी वर केले, त्यांच्या ध्यानीही नव्हते अन् मनीही नव्हते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, मीच म्हटले. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की असे आरोप करू नका. हे योग्य नाही. स्वतः फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बरच काही माहिती असल्याचे शरद पवार यांनी माध्यमांना सांगितले दिली.

त्यांनी वसुलीची चीप अथवा सॉफ्टवेअर दाखवावे. ते मुख्यमंत्री होते, पण त्या पदाला एक मान-सन्मान आहे. मी पण त्या पदावर होतो. पण, फडणवीस त्या पदाला धक्का पोहचवत आहेत. मला फडणवीस यांच्याकडून हे अपेक्षित नव्हते. महाराष्ट्राचा बंगालशी एक घरोबा आहे. त्याला एक मोठा इतिहास आहे. यासाठी शरद पवारांनी बंगाली बोलून दाखवले, हे ऋणानुबंध जुने आहेत. आम्ही ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही, म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

अमली पदार्थाची एक यंत्रणा आहे, जी आजवर कोणाला माहिती नव्हती. नवाब मलिकांच्या नातेवाईकांसोबत काय घडत आहे. त्यांच्यावर दबाव आणत आहेत. ते केंद्रावर बोलतात, म्हणून त्यांच्यावर हल्ला करता येत नसल्याने त्यांच्या जावयाला अटक केली. नवाब मलिक यांच्या जावयाकडे गांजा सापडला म्हणून अटक केली होती. पण संबंधित तज्ञ मंडळींनी हा गांजा नसून एक वनस्पती असल्याचे सांगितले. मग न्यायालयाने जामीन दिला. पण यामुळे तुरुंगात अडकून रहावे लागले. अमली पदार्थ पथकाने दोन साक्षीदार आणले, त्यात एक गुन्हेगार असल्याचे समोर येत आहे. नवाब मलिक यांच्या जावयाला अटक करताना एक पंच आणला. तो पंच गुन्हेगार असल्याचे समोर आले. पण तेव्हापासून तो गायब आहे. पुणे पोलिसांनी त्याच्यासाठी वॉरंट काढले आहे. म्हणजे हे गुन्हेगारांना सोबत घेऊन कारवाई करतात. गुन्हेगारांना सोबत घेऊन कारवाई करायची आणि चांगल्या लोकांना अडकवायचे, या यंत्रणेचे हेच धोरण दिसते.

यंत्रणेवर आरोप केला तर खुलासा द्यायला भाजपचे नेते पुढे येतात. त्या यंत्रणेच्या प्रमुखांनी उत्तर दिले, तर समजू शकतो, पण भाजप जर त्यावर बोलत असेल. तर याचा स्वच्छ अर्थ आहे की भाजप ह्यांना चालवते. महाविकासआघाडी सरकार ढासळत नसल्यामुळे, भाजप अस्वस्थ आहे. त्यामुळे राजकीय आकसाने हे होत आहे. केंद्र सरकारने या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा.