पुण्यातील कॉलेज सुरु करण्यावरुन उदय सामंत यांनी अजित पवारांचे नाव न घेता लगावला टोला


मुंबई – पुण्यात आजपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घोषणेनंतर सुरु झालेले कॉलेज बंद होणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून जोपर्यंत लेखी आदेश मिळत नाही, तोपर्यंत अनेक शिक्षण संस्थांच्या प्रशासनाकडून कॉलेज सुरु न करण्याची भूमिका घेण्यात आला आहे. दरम्यान कॉलेज सुरु करण्याची घोषणा करणाऱ्या अजित पवारांचे नाव न घेता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एबीपी माझाशी बोलताना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर कॉलेज सुरु होतील, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

जो काही गोंधळ पुण्यात झाला आहे, तो एक-दोन कॉलेजमध्ये झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री या नात्याने तिथे बैठक घेतली होती. कॉलेज सुरु झाली पाहिजेत अशी त्यांची इच्छा असून तशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. यासंदर्भात सर्व कुलगुरुंशी उद्या चर्चा करुन मी तातडीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहे. त्यानंतर दोन दिवसांत कॉलेज कधी सुरु करायचे? एसओपी काय असेल? अभ्यासक्रम, हजेरी यासंबंधी निर्णय घेणार आहोत. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊनच सर्व निर्णय घेणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून कॉलेज सुरु करण्यास काही हरकत नाही, अशी सर्वांची भूमिका आहे. मला राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील काल कॉलेज सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत, असे म्हटले आहे. त्यांचीदेखील मी उद्या भेट घेणार आहे. येत्या दोन दिवसांत कॉलेज कधी सुरु होतील याचा निर्णय घेतला जाईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान उदय सामंत यांना समन्वयाचा अभाव होता का असे विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, ज्या कॉलेजची नावे समोर येत आहेत, त्यांच्याकडे स्वायत्तता असल्यामुळे त्यांनी देखील सुरु करताना विचारणा करणे गरजेचे होते. पण त्यांचा यात दोष असल्याचे मी मानत नाही. कदाचित संभाषणाचा अभाव असेल. पण उपमुख्यमंत्र्यांनी केलेली सूचना आम्ही तंतोतंत पाळत आहोत. आम्ही आजपर्यंत कोणताही आदेश किंवा जीआर काढलेला नाही. तो लवकरच काढणार आहोत. गरज लागल्यास विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची सोयदेखील उपलब्ध करणार आहोत. कॉलेज सुरु करायची आहेत, पण घाई करुन मी सर्वात पहिले सुरु केले या अविर्भावात कोणी सुरु करु नये. शेवटी आपल्याला विद्यार्थी आणि पालकांची चिंता आहे.