गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचे मुंबई पोलीस पाळत ठेवत असल्याच्या समीर वानखेडेंच्या आरोपांवर स्पष्टीकरण


मुंबई – मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूजवर एनसीबीने छापा टाकून आर्यन खानसह एकूण ८ आरोपींना अटक केल्यापासून हे प्रकरण राज्यात चर्चेत आहे. या प्रकरणावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा खळबळजनक आरोप करत ही कारवाई करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी त्याविषयी तक्रार केली. यासंदर्भात आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खुलासा केला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात विचारणा केल्यानंतर त्यांनी यावर भूमिका मांडली आहे.

राज्यातील वातावरण समीर वानखेडे यांच्या आरोपांमुळे तापलेले असतानाच मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भूमिका या संदर्भात महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी यासंदर्भात विचारणा करताच गृहमंत्र्यांनी तशा कोणत्याही सूचना कुणाला दिल्या नसल्याचे सांगत समीर वानखेडेंचे आरोप फेटाळून लावले.

मला वाटत नाही की मुंबई पोलिसांचे अधिकारी वॉच ठेवतात वगैरे. त्यांना तशा कोणत्याही सूचना कुणालाही दिलेल्या नसल्याचे दिलीप वळसे पाटील यावेळी म्हणाले. तसेच, त्यांच्या आरोपांविषयी आपल्याला फार माहिती नाही, त्याची अतिरिक्त माहिती घेऊन मी त्यावर बोलेन, असे देखील यावेळी वळसे पाटील म्हणाले.

राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी भेट घेतली व दोन पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार केली. वानखेडे यांच्यासह एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन हे देखील यावेळी उपस्थित होते. वानखेडे यांनी केलेल्या आरोपात काही धक्कादायक दावे केले आहेत. काही लोक माझ्या हालचालींवर लक्ष ठेऊन असल्याचे वानखेडे यांनी जैन आणि पांडे यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोनजण वानखेडे यांच्यावर पाळत ठेवत त्यांच्या मागावर असल्याचे सीसीटीव्ही फुटेजही हाती लागल्याची माहिती देण्यात आली आहे. हे प्रकरण फार गंभीर असल्याचे सांगत वानखेडे यांनी यावर थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.