१ हजार गाड्यांचा ताफा घेऊन नवज्योत सिंग सिद्धू लखीमपूरकडे रवाना


नवी दिल्ली – काँग्रेसने लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्याच्या घटनेवर आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या हकालपट्टीची काँग्रेसने मागणी करत लखीमपूर खेरीला गाड्यांचा मार्च काढला आहे. हजारो गाड्यांसह लखीमपूरकडे पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू रवाना झाले आहेत. त्याचबरोबर राजस्थानमधूनही शेकडो गाड्या उत्तर प्रदेशकडे रवाना झाल्या आहेत. त्यामुळे लखीमपूर हिंसाचाराचा मुद्दा ऐरणीवर येऊन उत्तर प्रदेशमधील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.


दरम्यान नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला जर अटक केली नाही, तर मी उद्यापासून उपोषणाला बसेल. काँग्रसेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करत या गाडी मार्चची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये लखीमपूर खेरी हिंसाचाराविरोधात आणि शहीद शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नेतृत्वात आमदार, नेते आणि कार्यकर्ते लखीमपूरकडे रवाना झाले आहेत. काँग्रेस न्यायाच्या लढाईत शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने या ट्विटमध्ये #SackAjayMishra असा हॅशटॅगही वापरला आहे.

लखीमपूर घटनेवर काँग्रेस नेते हरिश रावत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे. सहिष्णु भारत असहिष्णु होत आहे. लखीमपूर खेरीची घटना याचंच उदाहरण आहे. उत्तराखंड काँग्रेसने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लखीमपूर चलोचे आवाहन केले आहे.

एकूणच लखीमपूर खेरीकडे काँग्रेसने विविध राज्यातील नेते आणि कार्यकर्ते रवाना होत आहेत. काँग्रेसने राजस्थानमधील मार्चची माहिती देताना सांगितले, लखीमपूर खेरी हिंसाचाराविरोधात आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह गोतसरा यांच्या नेतृत्वात शेकडो गाड्यांचा ताफा उत्तर प्रदेश सीमेकडे रवाना झाला आहे. काँग्रेस शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या लढाईत त्यांच्या नातेवाईकांसोबत असेल.