लखीमपूर हिंसाचार ; शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणारा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल


लखनऊ : केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीने चिरडले होते. आतापर्यंत नऊ शेतकऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये एक एसयूव्ही गाडी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गर्दीत घुसते आणि त्यांना तशीच चिरडत पुढे निघून जात असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. लखीमपूर खेरी या ठिकाणचा हा व्हिडीओ असल्याचे सांगण्यात येत आहे.


सोशल मीडियावर जवळपास 25 सेकंदाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. आंदोलक शेतकरी सरकार विरोधी घोषणाबाजी करत रस्त्यावरून चाललेले असताना मागून अचानक एक एसयूव्ही कार येते आणि त्यांना चिरडून तशीच पुढे निघून जाते. पण हा व्हिडीओ लखीमपूरमधील आहे की नाही याची सत्यता उत्तर प्रदेश पोलिसांनी अद्याप तपासलेली नाही. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्यातील ही एसयूव्ही होती. मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा हाच या एसयूव्हीमध्ये बसला होता, असे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

सोशल मीडियावर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. लखीमपूरचे ते भाजप खासदारही आहेत. त्यांनी शेतकरी आंदोलकांबाबत सुधर जाओ वरना दो मिनीट लगेंगे हमे… अशा पद्धतीची भाषा वापरली होती. याच केंद्रीय मंत्र्याचा एक कार्यक्रम रविवारी लखीमपूर होणार होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी तिथे निदर्शने करण्याचा निर्णय घेतला.