लखीमपूर हिंसाचार; शरद पवारांची संतप्त प्रतिक्रिया


नवी दिल्ली – शेतकऱ्यांसोबत लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारासंदर्भात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर भाजप विरोधक आक्रमक झाले आहेत. पण, याविषयी मोदी सरकार किंवा उत्तरप्रदेश सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. या घटनेबद्दल आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकार असो वा उत्तरप्रदेश सरकार असंवेदनशील असल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली आहे.

दिल्लीमध्ये माध्यमांशी यासंदर्भात त्यांनी संवाद साधला. पवार यावेळी म्हणाले, ज्यांचे जीव या हिंसाचारामध्ये गेले त्याची जवाबदारी भाजप शासित दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारचीच पूर्णपणे आहे. या हिंसाचाराचा मी निषेध करतो. पण फक्त निषेध करून आम्हाला शांती मिळणार नाही. या प्रकरणाचा तपास, चौकशी केली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश मार्फत चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध पानी का पानी झाले पाहिजे. केंद्र सरकारची नियत या प्रकारामुळे काय आहे, हे दिसून येत आहे. त्यांच्याकडे आज हुकूमत आहे म्हणून ते आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, हे सफल होणार नाही. हातात असलेल्या ताकदीचा गैरवापर केला जात आहे. शेतकऱ्यांनो, भले तुमच्यावर हल्ला झाला असेल आम्ही तुमच्या बरोबर आहोत.

केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार हे संवेदनशील नाही. जशी परिस्थिती जालियनवाला बागमध्ये झाली होती, तशी परिस्थिती येथे निर्माण झाली असल्याचेही पवार म्हणाले. शेतकरी आंदोलनाविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, शेतकऱ्यांचा एक मोठा वर्ग दिल्लीच्या सीमेवर शांतीने आंदोलन करत आहे, पण त्यांच्यावर २६ जानेवारीला हल्ला केला गेला, ज्याच्या प्रतिक्रिया पूर्णपणे देशभर उमटल्या. लोकशाहीमध्ये शांततेने आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. लखीमपूर येथे जमलेले शेतकरीही शांततेने आंदोलन करत होते, आपल्या मागण्या मांडत होते. पण त्यांच्या अंगावर गाडी चढवण्यात आली. ज्यात काही जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो.