राज्य सरकारची नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर; यंदाही गरबा, दांडियाच्या आयोजनावर बंदी


मुंबई – राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट सध्यातरी कमी झाले असल्याचे दिसत असले तरी तरी खबरदारीचा उपाय म्हणून थोड्याच दिवसांनी सुरु होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारने सोमवारी येत्या ७ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. गेल्यावर्षांप्रमाणे यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा, दांडियाच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली असून मूर्तीची उंची आणि मंडपाच्या आकारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक मंडळातील मूर्ती चार तर घरगुती देवीची मूर्ती दोन फुटांची असणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना केल्या आहेत.

यावेळी ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवासाठी सरकार सज्ज झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने नवरात्रोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून नवरात्रीत गरबा किंवा दांडीया खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे.

जरी राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी अजूनही धोका कायम असल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गदी करुन उत्सव साजरा करू नये, अशा सूचना राज्य सरकारतर्फे देण्यात आल्या आहे. नागरीकांनी नवरात्रोत्सव साजरा करताना आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना लागू करण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार मंडप उभारण्यासाठी पालिकेकडून नवरात्रोत्सव मंडळांना पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून यासाठी ऑनलाइन सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. यंदा विनाशुल्क परवानगी देण्यात येत आहे. पालिकेने निश्चित केलेल्या आकारमानानुसारच मंडप परवानगी दिली जाणार आहे. पर्यावरणाचा विचार करता मूर्ती शाडूची असावी, सजावट पर्यावरणपूरक असावी, सार्वजनिक मंडळातील मूर्ती चार फूट उंचीची, तर घरगुती मूर्ती दोन फूट उंचीची असणेही आवश्यक असल्याचेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवाकरीता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्विकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची व्यवस्था करावी. तसेच आरोग्य विषयक सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबा, दांडिया किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रमे/ शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.