केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे शरद पवारांनी केले कौतुक


नगर – वेगाने काम करण्यासाठी आणि नवनवीन कल्पना राबवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे ओळखले जातात. गडकरींचे सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून नेहमीच कौतुक होत असते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील नगरमध्ये एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांचे कौतुक केले असून त्यांनी यावेळी उपस्थितांना त्यांच्या कामगिरीचा उल्लेख करताना आलेला अनुभव देखील सांगितला. देशातील रस्ते गडकरींच्या काळात दुप्पट झाल्याचे देखील शरद पवारांनी यावेळी नमूद केले. नितीन गडकरी आणि शरद पवार नगरमध्ये महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी एकाच व्यासपीठावर आले. यावेळी शरद पवार बोलत होते.

शरद पवारांनी यावेळी बोलताना रस्त्यांचे देशाच्या विकासातील महत्व सांगितले. रस्त्याची वाहतूक समाजाच्या व्यापक हितासाठी महत्त्वाची असते, असे सांगतानाच यात गडकरींचा मोलाचा वाटा असल्याचे ते म्हणाले. गडकरींनी रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी घेण्याच्या पूर्वी देशात ५ हजार किमीचे काम झाले होते. तोच आकडा गडकरींकडे जबाबदारी आल्यानंतर १२ हजार किमीच्या पुढे गेला असल्याचे शरद पवार म्हणाले.

शरद पवारांनी यावेळी बोलताना आपल्याला रस्त्याने प्रवास करायला आवडत असल्याचे सांगितले. मला कामानिमित्त देशाच्या अनेक राज्यांमध्ये जावे लागते. गाडीने प्रवास करण्यात मला स्वत:ला आनंद मिळतो. कारण त्यामुळे रस्ते बघायला मिळतात, आजूबाजूच्या शेतातील पीक बघायला मिळते. म्हणून शक्यतो रस्त्यांनी प्रवास करण्याचा मी प्रयत्न करतो, असे ते म्हणाले.

दरम्यान, शरद पवारांनी यावेळी बोलताना इतर राज्यांमध्ये त्यांना येत असलेल्या अनुभवाविषयी सांगितलं. देशाच्या कोणत्याही राज्यात गेल्यानंतर त्या ठिकाणचे उत्तम रस्ते बघायला मिळतात. तेथील खासदार, मंत्री, अधिकाऱ्यांकडे हा विषय काढला की ते म्हणतात, ही तर गडकरी साहेबांची कृपा आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी सत्तेचा अधिकार हातात आल्यानंतर त्याचा उपयोग देशाच्या उभारणीसाठी कसा करू शकतो, याचे उत्तम उदाहरण गडकरींनी दाखवले असल्याचे शरद पवार म्हणाले.

तसेच आपल्याकडे येणाऱ्या लोकप्रतिनिधीचा पक्ष न बघता विकासकाम नितीन गडकरी बघतात, असे शरद पवार म्हणाले. मी संसदेत बघतो की गडकरींकडे येणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा ते पक्ष बघत नाही, तर त्याने आणलेले विकासकाम काय आहे, हे ते पाहतात. त्याचा परिणाम देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात होतो, असे शरद पवार यावेळी म्हणाले.