उद्ध्वस्त झालेल्यांचा आधार व्हा – यशोमती ठाकूर यांचे अधिकाऱ्यांना आवाहन


अमरावती : राज्यातील जनतेला प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सौहार्दाची, आपुलकीची आणि न्यायाची अपेक्षा असते. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उद्ध्वस्त झालेल्या लोकांचा आधार होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

अमरावती येथील महिला प्रबोधिनी येथे महिला बाल विकास अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन महिला आणि बालविकास विभागात एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणादरम्यान महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. तसेच राज्यातील नव्याने रुजू झालेल्या काही अधिकाऱ्यांचं वर्तन जनतेप्रति कसे मुजोरपणाचे होते याचा किस्सा सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना वेळीच प्रशिक्षण मिळालं नाही तर त्यांची वागणूक कशी होते याचे उदाहरण दिले.

त्यामुळे संघर्ष करून आलेल्या अधिकाऱ्यांनी जनतेचा संघर्ष कमी व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. लोकांच्या हिताची धोरणे आखली पाहिजेत आणि ती प्रभावीपणे अंमलात आणली पाहिजेत. यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन ठाकूर यांनी यावेळी सर्व प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना केले.