राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यासंबंधी उदय सामंत यांनी दिली महत्वाची माहिती


मुंबई – राज्यातील शाळा येत्या ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. पण महाविद्यालये कधी सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पण, आता महाविद्यालये सुरू करण्यासंबंधी महत्त्वाची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत माध्यमांशी बोलताना दिली आहे.

सामंत यावेळी बोलताना म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी योग्य ती काळजी घेऊनच महाविद्यालये सुरू करण्याचा आमचा विचार आहे. पण, पटसंख्या हाच महत्त्वाचा विषय आहे. कशा पद्धतीचा फॉर्मुला त्यासाठी तयार करायचा ह्यावर विचार करुनच कॉलेज सुरू करायची आहेत. शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पण, मागच्या वेळी गैरसमज असा झाला की, तेव्हापासून महाविद्यालये सुरू होणार आहेत. १ नोव्हेंबरपासून महाविद्यालये सुरू करावीत असे, यूजीसी आणि एआयसीटीईचे म्हणणे आहे. पण त्या काळात आपल्याकडे दिवाळीचा सण असल्यामुळे महाविद्यालये त्या काळात सुरू करता येणार नाहीत. त्यानंतरच कदाचित कॉलेज सुरू करण्यात येईल. त्या विचारात आम्ही आहोत.

सामंत पुढे म्हणाले, महाराष्ट्रात सध्याच्या घडीला पूरपरिस्थिती आहे. नैसर्गिक आपत्ती राज्यातील अनेक भागांमध्ये आली आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देता आली नाही. त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सीईटीच्या परीक्षा झाल्याशिवाय, त्याचा निकाल लागल्याशिवाय कॉलेज सुरू करता येणार नाहीत. त्यामुळे ही परीक्षा लांबली तर महाविद्यालयं सुरू करण्याची तारीख अजून पुढे जाईल. ज्याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, त्या ठिकाणी महाविद्यालये सुरू करण्यास हरकत नाही. याविषयी राज्य कृती दल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.