गोंदिया जिल्ह्यातील कासा, किन्ही आणि कटंगटोला गावच्या पुनर्वसनासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश


मुंबई : गोंदिया जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित मौजे मरारटोला (कासा), किन्ही, आणि कटंगटोला या गावातील बाधित घरांच्या पुनर्वसनासाठी १५ दिवसाच्या आत सुधारित प्रस्ताव सादर करावा असे निर्देश मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. गोंदिया जिल्ह्यातील कासा, किन्ही आणि कटंगटोला या गावातील पूरग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन व इतर मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

ही गावे २००५ च्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झाली. तेव्हापासून नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. या गावांच्या पुनवर्सनाबाबत वारंवार प्रस्तावही पाठविण्यात आले. तरी, पुनर्वसन झालेल्या वडगावच्या धर्तीवर कासा, किन्ही आणि कटंगटोला या गावांचे देखील पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी बैठकीत केली.

अतिवृष्टी किंवा पुरामुळे अंशतः बाधित झालेल्या गोंदिया जिल्ह्यातील कासा, किन्ही आणि कटंगटोला या गावांच्या प्रस्तावित पुनर्वसनासाठी प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्यात येऊन प्राप्त झालेला अहवाल, कासा, किन्ही, कटांगटोला या गावातील गावनिहाय एकूण घरांची संख्या व एकूण बाधित घरे याबाबतची सविस्तर माहिती यावेळी गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे दिली. त्यानंतर वडेट्टीवार यांनी गोंदिया जिल्ह्यातील कासा, किन्ही, आणि कटंगटोला गावच्या पुनर्वसनासाठी १५ दिवसाच्या आत सुधारित प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले.