रक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांचे आवाहन


मुंबई : राज्यातील रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणेतील सर्व घटक, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार, सिव्हील सर्जन यांनी त्यांच्या स्तरावर पुढाकार घेऊन नियमांचे पालन करुन रक्तदान शिबीरे आयोजित करावीत, असेही त्यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे.

डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले, राजकीय पदाधिकारी यांनी राजकीय नेत्यांचे वाढदिवस तसेच थोर व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी व इतर तत्सम कार्यक्रमाच्या दिवशी रक्तदान शिबीरे आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

थॅलसेमिया, कॅन्सर रुग्णांसाठी नियमित रक्ताची गरज भासते. यास्तव या रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून रक्तदात्यांनी पुढे येऊन स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे. असेही डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले आहे.

राज्य रक्त संक्रमण परिषद व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रक्त उपलब्धततेसाठी कार्यआराखडा तयार करुन सर्वतोप्रयत्न करावेत, असे डॉ.शिंगणे यांनी निर्देश दिले आहेत. रक्तपेढ्यांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबीरे आयोजित करावीत, असे रक्तपेढ्यांना आवाहन केले आहे.