मुंबई – ठाकरे सरकावर विविध मुद्यांवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने टीका करत असतात. त्यांच्या टीकेवरून राजकीय वादंग देखील निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. गोपीचंद पडळकर यांनी आता देखील राज्यातील विविध विभागातील पदभरतीच्या मुद्यावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राज्यामधील अनेक विभागातील पदभरतीवरुन गोपीचंद पडळकरांची ठाकरे सरकारवर टीका
११ हजार ३५१ पदे आघाडी सरकारमध्ये अनेक विभागात रिक्त असताना, मात्र यांनी एमपीएससीकडे फक्त ४ हजार २६४ पदांची मागणी केली. स्वतःच्या मुलांना आमदार-खासदार करण्यापुरते प्रस्थापितांकडे रिक्त पदे आहेत. बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता, अशी जोरदार टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
#आघाडी_सरकारमध्ये अनेक विभागात ११,३५१ पद रिक्त असताना मात्र यांनी #MPSC कडे फक्त ४,२६४ पदांची मागणी केली. स्वतःच्या मुलांना आमदार-खासदार करण्यापुरते प्रस्थापितांकडे रिक्त पदं आहेत. बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता @CMOMaharashtra @BJP4Maharashtra pic.twitter.com/bIK7ETXt6Z
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) September 25, 2021
ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ते या व्हिडिओत म्हणतात, ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेमुळे स्वप्नील लोणकरला जीव गमवावा लागला होता. तरी देखील या सरकारने ना नियुक्त्या दिल्या ना पदभरती केली. आतातर वेगवेगळ्या २० विभागात जवळपास ११ हजार ३५१ पद रिक्त असताना, लोकसेवा आयोगाकडे केवळ ४ हजार २६४ रिक्त पदांच्या पदभरती करावी अशी मागणी सरकारच्यावतीने करण्यात आली आहे.
यापेक्षा कहर म्हणजे कोरोनाच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागात जवळपास विविध श्रेणीतील २५०० च्या आसपास पदे रिक्त होती. तरी देखील अमित देशमुख यांनी कोणतीही पद भरतीची मागणी, सरकारकडे केली नाही. हीच परिस्थिती अनेक खात्यांची आहे. प्रशासन आणि सरकार यांच्यात कसलाही ताळमेळ नाही. मग हे काय फक्त टक्केवारीच्या फुगड्या खेळत आहेत का? प्रस्थापितांकडे स्वत:ची मुले आमदार, खासदार करण्यासाठी रिक्त जागा असतात, पण बहुजन समाजातील मुलांनी यांच्या सतरंज्या उचल्याव्यात, अशी यांची मानसिकता झाली असल्याचे देखील पडळकर म्हणाले आहेत.