मुंबईतील भाजप नगरसेविकेच्या कार्यालयातच महिलेचा लैंगिक छळ


मुंबई – एका महिलेचा लैंगिक छळ मुंबईत भाजप नगरसेविकेच्या कार्यालयातच करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उपनगर बोरिवलीत घडली आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान काँग्रेस आणि शिवसेनेने या प्रकरणावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिचा आवाज दाबण्यासाठी भाजप नगरसेविकांनी मारहाण केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा भाजपचे नेते प्रयत्न करत आहेत. फडणवीस सरकारच्या काळातच महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले होते. दुसरीकडे देशपातळीवर भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. आत्ताची घटना त्यापेक्षाही गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांना भाजपच्या महिला नेत्या पत्र लिहितात आणि दुसरीकडे त्यांच्याच कार्यालयात विनयभंग होतो ही गंभीर बाब आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्या महिलेने खासदार गोपाळ शेट्टी व आमदार सुनील राणे यांना पत्र लिहून मदत मागितली. पण त्यांनी न्याय दिला नाहीच, उलट तेथील भाजप नगरसेविकांनी महिलेला मारहाण केली. हे यांचे खरे चरित्र आहे आणि महिला अत्याचारासंबंधी हीच यांची भूमिका असल्यामुळे फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी याचे उत्तर दिले पाहिजे. भाजपच्या कार्यालयातच महिला सुरक्षित नसल्याचे सचिन सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.


सचिन सावंत यांनी या संदर्भात एक ट्विट केले असून ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग झाला आणि महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिचा आवाज दाबण्यासाठी भाजप नगरसेविकांनी मारहाण केली. हे भाजपचे महिला विरोधी रुप असल्याचे म्हटले आहे. महिलेचा आवाज दाबला त्या भाजप नेत्यांवर फडणवीस साहेब आणि चंद्रकांत दादांनी काय कारवाई करणार हे स्पष्ट करावे. अत्याचार झालेल्या महिलेच्या विरोधात संपूर्ण भाजप उभी आहे. अत्याचार करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप करत सचिन सावंत यांनी निषेध दर्शवला आहे.

दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी धाय मोकळून रडणाऱ्या भाजपच्या ताई आज कुठे आहेत? आज सकाळपासून भाजपच्या ताईंचा फोन बंद आहे. भाजपच्या ताई पब्लिक स्टंटसाठी पुढे येणार आणि आता गप्प बसणार…भाजपच्याच कार्यालयात महिलेला छळले जाते, मारहाण होते. यांच्या दिव्याखालीच अंधार आहे. मी स्वत: बोरिवलीच्या प्रकरणात लक्ष घालणार असून पोलीस स्टेशनला जाणार आहे. भाजपकडून केवळ महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम होत आहे. कोणत्याही पक्षाची महिला असो, अन्याय होत असेल तर भूमिका घेतली पाहिजे. मी असते तर थोबाड फोडले असते, असे म्हटले आहे.