आयसीसीचे टी-20 विश्वचषक स्पर्धेचे थीम साँग रिलीज


आयपीएलनंतर लगेचच आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धा सुरु होणार आहे. क्रीडाप्रेमींमध्ये आतापासून विश्वचषकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच आयसीसीने आता आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी थीम साँग लाँच करत उत्सुकतेत भर घातली आहे. हे थीम साँग सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या गाण्याला “Live The Game” असे नाव देण्यात आले आहे.

हे गाणे आयसीसीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. हे गाणे बॉलीवूडचे प्रसिद्ध संगीतकार अमित त्रिवेदीने कंपोज केलं आहे. या गाण्यात खेळाडूंचा अ‍ॅनिमेटेड अवतार पाहायला मिळत आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली, अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू राशिद खान, वेस्ट इंडिजचा कर्णधार पोलार्ड आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल यात दिसत आहेत. हे गाणे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच क्रिकेट रसिकांचा यावर लाईक्सचा वर्षाव सुरु आहे.


टी-२० विश्वचषक स्पर्धा स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ओमान आणि यूएईत खेळली जाणार आहे. यासाठी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जय शाह आणि चेतन शर्मा यांच्या उपस्थितीत संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दीक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांची निवड करण्यात आली आहे. सुर्यकुमार यादव, राहुल चहर, इशान किशन, वरुण चक्रवर्ती यांना वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर हे राखीव खेळाडू असतील, असं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा टी २० विश्वचषक संघाचा मार्गदर्शक असणार आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता फेरीचे सामने २३ सप्टेंबरपासून खेळले जाणार आहेत. या पात्रता फेरीत श्रीलंका, आयर्लंड आणि बांगलादेश हे संघ सहभागी होणार आहे. प्राथमिक फेरीतील आठ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. या पात्रता फेरीतून चार संघ सुपर-१२ साठी पात्र ठरणार आहेत. २०१६ नंतरचा हा पहिला टी-२० विश्वचषक असेल. त्यावेळी वेस्ट इंडिजने इंग्लंडला पराभूत करून विजेतेपद जिंकले होते. सुपर-१०च्या गटातील सामन्यात भारताने पाकिस्तानला ६ गडी राखून पराभूत केले. उपांत्य सामन्यात भारताला विंडीजकडून पराभवाला सामोरे जावे लागले.