NEET परीक्षेमध्ये मोठा घोटाळा; महाराष्ट्र सरकार NEET हद्दपार करण्याच्या तयारीत?


मुंबई : तामिळनाडू सरकारने राज्यातील NEET परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी NEET परीक्षा फायद्याची आहे का? याबाबत राज्य सरकार आढावा घेणार आहे. हा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून त्यामुळे राज्यातील NEET परीक्षेचे भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मोठा घोटाळा NEET परीक्षेमध्ये झाल्याचे समोर आले असून तामिळनाडूतील परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्यांने आत्महत्याही केल्याची घटना घडली आहे. डमी विद्यार्थी या परीक्षेमध्ये बसवून शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सीबीआयनेही NEET परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचे स्पष्ट केले आहे. या घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्रातील आरके एज्युकेशन करिअर गाईडन्सचा संचालक परिमल कोटपल्लीवार आणि इतर काही विद्यार्थ्यांना जबाबदार धरले असून सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBS साठी प्रवेश मिळवून देण्यासाठी 50 लाख रुपये घेऊन, त्या ठिकाणी डमी विद्यार्थी बसवण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. राज्यातील टॉपच्या वैद्यकीय महाविद्यालयात डमी विद्यार्थ्यांच्या मार्फत प्रवेश मिळवून देण्याचा प्रकार घडत आहे. असा प्रकार या आधीही घडल्याची शक्यता असून त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

दरम्यान तामिळनाडूत एका विद्यार्थ्याने NEET परीक्षेच्या आधी आत्महत्या केली. एका विद्यार्थिनीने ही परीक्षा झाल्यानंतरही आत्महत्या केल्याचे समोर आले. तामिळनाडू विधानसभेत या घटनेचे पडसाद उमटले असून राज्यात नीट परीक्षा नको अशी भूमिका असणारे विधेयक मांडण्यात आले. या विधेयकाला तामिळनाडूतील भाजप वगळता इतर राजकीय पक्षांनी पाठिंबा देत हे विधेयक मंजूर केले. तामिळनाडूमध्ये आता 12 वीच्या गुणांवर मेडिकल अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार आहे.