मुंबई वगळता इतर सर्व महानगरपालिका निवडणुकीसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत


मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल, तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. पण 2 सदस्यीय प्रभाग पद्धत नगरपालिका आणि नगरपरिषदेत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असेल. गेल्या काही काळापासून वॉर्ड तसच प्रभाग पद्धतीवर मोठे राजकारण सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान काही नेत्यांची पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर यासह काही महानगरपालिकेत दोन सदस्य प्रभाग पद्धत रहावी, अशी काही नेत्यांची भूमिका आहे. नगरपंचायतीत एक सदस्य प्रभाग पद्धत, तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्य प्रभाग पद्धत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आगामी महापालिकेच्या निवडणुका सध्या अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेनुसार होणार की वॉर्डप्रमाणे याबाबत अनेक दिवस अनिश्चितता होती. याबाबत सरकार ऐन वेळेवर निर्णय घेऊ शकते, असे राजकीय पक्षांचे मत होते. दरम्यान, शहरांचा विस्तार वाढल्यामुळे सीमालगतचा भाग शहरात समाविष्ट केल्यास वॉर्डाची संख्या वाढू शकते. असे झाल्यास नव्याने वॉर्ड किंवा प्रभाग रचना केली जाण्याची शक्यता असते.

पुढील वर्षी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.