सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुख यांच्यावरील आयकर विभागाच्या कारवाईचे केले समर्थन


मुंबई – आयकर विभागाने शुक्रवारी सकाळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरासोबतच त्यांच्याशी संबंधित एकूण ६ ठिकाणी छापा टाकला. आयकर विभागाची चौकशी अद्यापही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून भाजपवर आयकर विभागाचा गैरवापर करून राजकीय हेतूने ही कारवाई केली जात असल्याची टीका सुरू केली आहे. त्यासंदर्भात आता राज्य सरकारवर खोचक शब्दांत भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे.

सध्या राज्यात एक घोषित गृहमंत्री आहेत आणि एक अघोषित गृहमंत्री आहेत. एक नामधारी गृहमंत्री आहेत, एक कार्यकारी गृहमंत्री आहेत. अशा प्रसंगामध्ये पोलीस विभागाला दिशाच राहिली नाही. मग काही पोलीस अधिकारी त्या पद्धतीने बेताल वागत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले आहेत. आयकर विभागाची अनिल देशमुख यांच्यावर होत असेलल्या कारवाईकडे राजकीय भावनेतून पाहू नये, असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.


त्याचबरोबर, राज्य सरकारवर खंडणी प्रकरणावरुनही परखड शब्दांत टीका केली. यांची कृती पाहून खंडणीखोरांनी देखील आत्महत्या करावी, अशी स्थिती आहे. अशा वागणुकीची चौकशी करणे गरजेचे आहे. कारण हा देखील एक मोठा धोका आहे. पोलिसांचे गुन्हेगारीकरण होणे किंवा पोलिसांचे राजकीयकरण होणे हा राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी चौथ्या स्तराचा कर्करोग आहे. म्हणून या प्रसंगात सखोल चौकशी केली जात आहे. त्याकडे आपण दोषपूर्ण नजरेने न पाहाता महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने बघितले पाहिजे, असे मुनगंटीवार म्हणाले.

आपल्या ट्वीटर हँडलवर मुनगंटीवार यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. या कारवाईमध्ये कुणाला त्रास देण्याचे काही कारण नाही. ते निर्दोष असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. स्वातंत्र्यानंतर राज्यात असे पहिल्यांदाच घडत असेल, की कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे माजी गृहमंत्री फरार आहेत. ज्यांच्याकडे या देशाच्या आर्थिक राजधानीची जबाबदारी होती, ते माजी पोलीस आयुक्तही फरार आहेत. हे देशातच नाही तर कदाचित जगात पहिल्यांदा घडत असेल, असे ते म्हणाले.