टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार विराट कोहली; ट्वीटरच्या माध्यमातून केले जाहीर


नवी दिल्ली – टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने जाहीर केला आहे. याबाबतची माहिती स्वत:च विराट कोहलीने ट्वीट करून दिली आहे. विशेषत: आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आधीच त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विराटने आपल्या ट्वीटर हँडलवर एक पत्रच ट्वीट केले असून त्यामध्ये आपल्या निर्णयाविषयी त्याने सविस्तर लिहिले आहे.

दरम्यान, विराटने या पत्रात आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर आपण कर्णधारपद सोडणार असल्याचे म्हटले आहे. विराट कोहलीने आपल्या पत्रामध्ये त्याला पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले आहेत. रोहित शर्मा, रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेतल्याचे विराट कोहलीने पत्रात म्हटले आहे.

विराट कोहलीने या पत्रामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विराट म्हणतो, फक्त भारतीय संघामध्ये सहभागी व्हायचीच नाही, तर भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी मला मिळाली, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून मला पाठिंबा आणि मदत करणाऱ्या सगळ्यांचे मी धन्यवाद करतो. संघातील प्रत्येक सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे प्रशिक्षक आणि आमच्या विजयासाठी प्रार्थना करणारा प्रत्येक भारतीय यांच्याशिवाय मी हे करू शकलो नसतो.


पत्रात पुढे विराट म्हणतो, आपल्यावर असणारा ताण समजून घेणे फार महत्त्वाचे असते आणि भारतीय क्रिकेट संघासाठी गेल्या ८ ते ९ वर्षांपासून तिन्ही प्रकारांमध्ये (टी २०, कसोटी, एकदिवसीय) आणि गेल्या ५ ते ६ वर्षांपासून सातत्याने कर्णधारपद सांभाळताना मला आता वाटू लागले आहे की, मी स्वत:ला वेळ द्यायला हवा. जेणेकरून एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारांमध्ये मी भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी पूर्णपणे तयार राहीन. टी-२० संघाचा कर्णधार म्हणून मी शक्य ते सगळे काही संघाला दिले आहे. एक फलंदाज म्हणून यापुढेही मी ते करत राहणार आहे.

दरम्यान, आपण हा निर्णय सर्वांशी चर्चा करूनच घेतल्याचे विराट सांगतो. अर्थात, मला या निर्णयापर्यंत येण्यासाठी बराच काळ लागला. माझ्या जवळच्या व्यक्तींशी, रवीभाई, रोहित यांच्याशी खूप सारी चर्चा केली आहे. त्यानंतर या निर्णयाप्रयत्न मी आलो आहे की ऑक्टोबर महिन्यात दुबईमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर मी टी-२० संघाचा कर्णधार म्हणून पायउतार होणार आहे. माझ्या निर्णयाविषयी मी बीसीसीआयचे सचिव जय शाह, अध्यक्ष सौरव गांगुली आणि निवड समितीच्या इतर सर्व सदस्यांसोबत बोललो आहे. भारतीय क्रिकेट आणि भारतीय संघाची सेवा मी अशीच करत राहीन, असे विराटने या पत्राच्या शेवटी म्हटले आहे.