मार्ग न निघाल्यास सर्वच पक्षांनी ओबीसी उमेदवार उभे करावेत – विजय वडेट्टीवार


मुंबई – राज्यातील ओबीसी आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्याचबरोबर अद्याप आगामी पोटनिवडणुकांच्या बाबतीत ठोस निर्णय झालेला नाही. याविषयी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपले मत मांडले आहे. यावेळी त्यांनी राजीनामा देण्याची तयारीही दाखवली आहे.

वडेट्टीवार यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, सध्या संपूर्ण देशातील ओबीसी आरक्षण धोक्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत आमचे डेटा एकत्र करण्याचे काम आम्ही करुच. पण या निवडणुका आम्हाला अध्यादेश काढून पुढे ढकलता येतात का याचा विचार आम्ही करु. काहीही मार्ग सापडला नाही, तर सर्वच पक्षांनी निवडणुकांना ओबीसी उमेदवार उभे करावेत.

निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सर्व पक्षांचे एकमत घेऊनच सर्व पक्षांच्या संमतीने घेतला जाईल, असेही त्यांनी अधोरेखित केले आणि आजच्या या परिस्थितीला भाजप जबाबदार आहे, महाविकास आघाडी किंवा काँग्रेस नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर जर हा प्रश्न माझ्या राजीनाम्याने सुटणार असेल, तर मी राजीनामा द्यायला तयार असल्याचेही ते म्हणाले आहे. त्याचबरोबर हा मुद्दा वाढवणे केवळ राजकीय हेतूने चालले आहे. जनतेला सगळे कळत असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.