न सांगता इतकी गर्दी जमली, सांगून बघू का?; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे भोसलेंचा राज्य सरकारला इशारा!


मुंबई – खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाविषयी काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये बोलताना राज्य सरकारच्या भूमिकेवर परखड टीका केली होती. यासंदर्भात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेले पत्र आपल्याला मान्य नसल्याचे म्हणत संभाजीराजे यांनी पत्रातील मुद्द्यांवरून सरकारवर टीकास्त्र सोडले होते.

संभाजीराजे भोसले यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. राज्य सरकारने पाठवलेले पत्र मुळात अधिकाऱ्यांनी लिहून पाठवले आहे. फक्त पाठवायचे म्हणून हे लेखी उत्तर पाठवले आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील याची पुरेशी दखल घेतलेली नसल्याचे म्हणत संभाजीराजे यांनी आपला संताप व्यक्त केला.

नांदेडमध्ये संभाजीराजे यांनी घेतलेल्या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यावेळी संभाजीराजे यांनी या गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले होते. संभाजीराजे भोसले यांनी त्याचा संदर्भ घेत राज्य सरकारला अप्रत्यक्षपणे इशाराच दिला आहे. आवाज उठवायचा म्हटला, तर मी उठवू शकतो. आम्ही न बोलवता किंवा सांगता देखील नांदेडला ५० ते ७० हजार लोक हजर होते. रायगडसारख्या ठिकाणी आम्ही सुरुवात करू. जर सरकार दखल घेत नसेल आणि आम्ही करायचेच असेल, ते करू शकतो. नांदेड ही फक्त एक झलक होती. तीही न सांगता. सांगून बघू का? मग सांगून बघू का, असे संभाजीराजे भोसले यावेळी म्हणाले.

दरम्यान, आमची परीक्षा घेऊ नका. सरकारने ठरवावे, तेव्हा बैठकीला बसायची आमची तयारी आहे. पण सरकारची तयारी नसेल, तर रायगडावर बसून आमची मूक आंदोलनाची तयारी आहे. मग नांदेडला जशी गर्दी जमली, तशी गर्दी जमली, तर मी जबाबदार राहणार नाही. हे चालेल का सरकारला? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला आहे. दरम्यान, यावेळी बोलताना संभाजीराजे भोसले यांनी आपण समाजाला वेठीस न धरता एकटे आंदोलन करू, ज्यामुळे कोरोनामध्ये होणारी गर्दी टाळता येईल, असे देखील नमूद केले.

आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या बाबतीत म्हटले की १८८५ कोटी रुपयांचा निधी वाटला. हे अधिकारी लोक एवढे फसवतात. हे पैसे सरकारने दिलेले नसून बँकांनी दिलेले आहेत. हे मागच्या सरकारने केलेले आहे. तुम्ही किती दिले हे अधिकाऱ्यांनी सांगावे. आत्ता जाहीर केले साडेबारा कोटी रुपये. जे पूर्वीच्या सरकारने केले, त्यापुढे आत्ताच्या सरकारने काहीही केले नसल्याचे देखील संभाजीराजे भोसले यावेळी म्हणाले.