मुंबई – ऑक्टोबर २०१८ ते डिसेंबर २०२० याकाळात कोस्टल रोडच्या कामात सुमारे १ हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार करून शिवसेनेने या घोटाळ्यात भागीदारी केली आहे का? असा सवाल करत भाजप आमदार नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत मुख्यमंत्र्यानी चौकशी करावी, अशी मागणी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत याची तातडीने दखल घेतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
आशिष शेलार यांनी केली कोस्टल रोड भ्रष्टाचाराची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी
तत्कालीन भाजप सरकारने वाहतूक कोंडीतून मुंबईकरांना बाहेर काढण्यासाठी जे महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले त्यातील अत्यंत महत्त्वाच्या कोस्टलरोड प्रकल्पाला आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची किड लागल्याचे आता उघड होत असल्यामुळे मुंबईकरांना मेट्रोप्रमाणे मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. या प्रकल्पात अंदाजे १ हजार कोटी व अधिकचा घोटाळा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते आहे. यावर भाजप लक्ष ठेवून आहे, यामध्ये काही मोठे लागेबांधे असल्याची शक्यता असल्यामुळे या प्रकरणी तातडीने एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र आमदार आशिष शेलार यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना दिले आहे.
स्थायी समितीच्या सहमतीने हा संपूर्ण घोटाळा झाला आहे का? जेव्हा मुंबईकर कोरोना काळात घरात बंद होते. तेव्हा शिवसेनेचे हे घोटाळे सुरु होते का? याची कंत्राटे कोणाला दिली हे सगळे आम्ही उघड करू, पण आधी सताधारी म्हणून शिवसेनेला या सगळ्यांची उत्तरे द्यावी लागतील अन्यथा आम्ही कायदेशीर मार्गाने ही लढाई लढू, असेही शेलार म्हणाले. आज वांद्रे पश्चिम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आणि आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात आमदार आशिष शेलार यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत शिवसेनेवर आरोप केले.
शेलार म्हणाले, महाराष्ट्र सरकार आणि पालिकेची आक्टोबर २०१८ ते डिसेंबर २०२० या काळात केवळ टप्पा १ मधील विविध कामात रुपये ६८४ कोटींची फसवणूक झाल्याची दिसून येते आहे. सर्वात चिंताजनक म्हणजे डिसेंबर २०२० नंतर, आजपर्यंत एकट्या पॅकेज १ मध्ये अतिरिक्त २३ लाख टन पुनर्प्राप्ती भरण्याचे साहित्य वापरले गेले आहे आणि वरीलपैकी बहुतेक बेकायदेशीर गोष्टी अजूनही केल्या जात असल्याचा आरोप आहे. असे असल्यास, पॅकेज १ मधील फसवणूकीची रक्कम रुपये ६८४ कोटींहून अधिक असून एकूणच प्रकल्पामधील बेकायदेशीरपणामुळे ही रक्कम रुपये १००० कोटींपेक्षा जास्त असेल.
हा सर्व घोटाळा पाहता या प्रकल्पाच्या तीनही टप्प्यात अशाच प्रकारे गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यांना यामध्ये कोणाचा राजकीय पाठींबा आहे का? कुणाच्या आशिर्वाद हा सारा प्रकार सुरु आहे? शासनाचा महसूल बुडवून हा पैसा भ्रष्टाचाराच्या मार्गाने कुठे वळवला गेला का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत होत असून या प्रश्नांची तातडीने एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.