चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे व शरद पवारांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचे सदाभाऊ खोत यांच्याकडून समर्थन


नांदेड : चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना महाराष्ट्राच्या राजकारणात पाठीत खंजीर खुपसणारा एकच चेहरा होता, आता दोन चेहरे झाले असल्याचे म्हटले होते. उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर चंद्रकांत पाटलांनी केलेले भाष्य हे वास्तववादी असल्याचे मत राज्याच्या पंचायतराज समिती दौऱ्यावर असणारे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.

सदाभाऊ खोत पुढे म्हणाले की, आपल्या आत्मचरित्रात शरद पवारांनी लिहिले आहे की शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल कुठेही विकता आला पाहिजे. पण ज्यावेळी कृषी विधेयक संसदेत आले, त्यावेळी त्यांनी त्याला मूक संमती दिली. सत्तेसाठी त्यांनी काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी केली. अनेकांना सत्तेसाठी चकवा दिला. त्यांची ही कुटनीति अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. म्हणून देशपातळीवरील राजकारणात शरद पवारांना अथवा त्यांच्या एखाद्या घोषणेला फारसे महत्व दिले जात नाही. त्याचबरोबर शरद पवार हे चकवा देणारे राजकारणी आहेत, हे देशपातळीवरील राजकारण्यांना माहित झाल्यामुळे उद्धव ठाकरे व शरद पवारांची चाल महाराष्ट्राला माहित झाली आहे. म्हणून मी चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानाशी सहमत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

एकट्याच्या बळावर भाजप सरकार स्थापन करणार तशी तयारी सुरू आहे. युतीत यावेळी निवडणूक लढणार नाही. फक्त आपल्यासोबत जे प्रामाणिकपणे आहे, त्यांच्यासोबत निवडणूक लढवणार. पण नाव मोठे लक्षण खोटे आपल्याला नको. आपल्याला पाठीत खंजीर खोपसणारे नको, असल्याचे बोलत चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली होता. आधी पाठीत खंजीर खुपसणारे एकच नाव होते, पण आता दुसरा चेहरा देखील दिसत, असल्याचे म्हणत चंद्रकांत पाटलांनी थेट शिवसेनेवर टीका केली होती.