बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ द्यावा – दादाजी भुसे


मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ द्यावा, अशा सूचना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. बुलढाणा जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्याबाबत कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत त्यांनी सूचना दिल्या. बैठकीस बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे उपस्थित होते.

कृषी मंत्री भुसे यांनी सांगितले की, पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ द्यावा. त्यासाठी एनडीआरएफच्या निकषानुसार भरपाईसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ द्यावा. पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई देण्याची आवश्यकता आहे. ही भरपाई लवकरात लवकर द्यावी.

बैठकीत झालेल्या चर्चेत खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय कुटे, संजय गायकवाड, आकाश फुंडकर, श्वेता महाले यांनीही सहभाग घेतला. पीक विमा योजनेतून भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली. बैठकीस राजेश एकडे, संजय रायमूलकर, कृषी सचिव एकनाथ डवले, किसान सभेचे अजित नवले, अजय बुरांडे, उपसचिव सुग्रीव धपाटे, मुख्य सांख्यिकी अधिकारी विनयकुमार आवटे आदी उपस्थित होते.