ऐतिहासिक! एकाचवेळी नऊ न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी दिली शपथ


नवी दिल्ली – एकाचवेळी नऊ न्यायाधीशांना आज सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी शपथ दिली. पहिल्यांदाच एवढा मोठा शपथविधी सोहळा पार पडला. तीन महिला न्यायाधीशांचा या ९ न्यायाधीशांमध्ये समावेश आहे. न्यायालयाच्या अतिरिक्त भवन परिसरातील सभागृहात हा शपथ सोहळा आयोजित करण्यात आला होता. नऊ न्यायाधीशांना सरन्यायाधीश एनवी रमण यांनी शपथ दिली. सामान्यत: न्यायाधीशांना कोर्ट रुममध्ये शपथ दिली जाते. श्रीनिवास ओका, विक्रम नाथ, जितेंद्र कुमार माहेश्वरी, हिमा कोहली, बीवी नागरत्ना, सीटी रविकुमार, एमएम सुंदरेश, बेला एम त्रिवेदी आणि पीएस नरसिम्हा यांनी शपथ घेतली.

नऊ न्यायाधीशांना मंगळवारी शपथ दिल्यानंतर सरन्यायाधीशांसह न्यायाधीशांची संख्या ३३ झाली आहे. तर स्वीकृत संख्या ३४ असल्यामुळे अजूनही एक जागा रिक्त असणार आहे. १७ ऑगस्टला सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ९ नवीन न्यायाधीशांच्या नावाला मंजुरी दिली होती. एकाही न्यायाधीशाची २०१९ नंतर नियुक्ती झाली नव्हती. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबर २०१९ रोजी निवृत्त झाल्यापासून नियुक्त्या रखडल्या होत्या. नऊ नावांची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने २२ महिन्यांनंतर पाठवली होती.


दुसरीकडे सप्टेंबर २०२७ मध्ये न्यायाधीश नागरत्ना या पहिल्या महिला सरन्यायाधीश बनण्याची शक्यता आहे. २०२७ मध्ये पदोन्नती मिळाल्यास देशाच्या पहिली महिला सरन्यायाधीश बनू शकतात. न्यायाधीश नागरत्ना या माजी सरन्यायाधीश ई एस वेंकटरमैया यांच्या कन्या आहेत. न्यायमूर्ती नागरत्न व्यतिरिक्त, पाच सदस्यीय कॉलेजियमने निवडलेल्या इतर दोन महिला न्यायाधीशांमध्ये तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती हिमा कोहली आणि गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बेला त्रिवेदी यांचा समावेश आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पी एस नरसिम्हा यांनी शपथ घेतली. पी एस नरसिम्हा थेट बारमधून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आहेत. १९९३ मध्ये न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम प्रणाली अस्तित्वात आल्यापासून नरसिम्हा बारमधून थेट सर्वोच्च न्यायालयात येणारे सहावे वकील बनले आहेत.