विश्वजीत कदम म्हणतात; कोरोना महामारी आणि महापूर परमेश्वराने ठाम भूमिका घेतल्यानेच आला


सांगली – राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी देशासह संपूर्ण जगावर गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ असलेले कोरोनाचे संकट आणि राज्यात दरवर्षी निर्माण होणारी पूरस्थिती या पार्श्वभूमीवर आता एक अजब तर्क लावल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत बोलताना विश्वजित कदम म्हणाले कि, कोरोना आणि पूर परमेश्वराने ठाम भूमिका घेतली म्हणूनच आला. परिणामी आपल्याला घरात बसावे लागले. सांगलीत शनिवार पार पडलेल्या पूर परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, विश्वजित कदम यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विश्वजित कदम सांगलीत झालेल्या पूर परिषदेत बोलताना असे म्हणाले कि, आपल्याला ही शिक्षा परमेश्वराने ठाम भूमिका घेत दिली आहे. कारण पिढ्यानपिढ्या आपण फक्त शोषण आणि प्रदूषणच केले. अनेक खून, चोऱ्या झाल्यामुळे अखेर परमेश्वराने ठाम भूमिका घेतली आणि कोरोना आला. आपल्याला त्याने घरात बसवल्यानंतर पूर आला. या सगळ्याचा जबरदस्त फटका आपल्या सर्वांनाच बसला आहे. पण आता यावर उपाययोजना करून या समस्या सोडवण्याच्या दिशेने पावले टाकणं आवश्यक आहे. दरम्यान, यावेळी मंचावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील देखील उपस्थित होते.

सांगलीत वारंवार निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर जयंत पाटील यांनी देखील भाष्य केले आहे. जयंत पाटील म्हणाले कि, पूर येणे हा काही विषय राजकीय नाही. आपण निसर्गाशी फार मोठा खेळ केला आहे. माणसाकडून वारंवार अतिक्रमण करण्यात आल्यामुळे निसर्गाने हे रूप धारण केले आहे. सांगली शहरात बिबट्या, मगरी येऊ लागल्या आहेत. हा फार गंभीर प्रश्न आहे. मानवाच्या अनेक चुका झाल्या आहेत. त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागणार आहेत.

जयंत पाटील पुढे बोलताना असेही म्हणाले कि, पाऊस एका निश्चित मर्यादेपेक्षा जास्त पडला, तर आपण काहीच करू शकत नाही. मागच्या वेळी धरणाच्या मागे पाऊस पडला त्यावेळी याचा अनुभव आम्हाला आला. त्यावेळी जिवंत जनावरे वाहून गेल्याचे पाहून डोळ्यात पाणी आले होते. आपण पडणारा पाऊस आणि धरणात येणार पाऊस याचा ताळमेळ लावू शकतो. पण यावेळी पडणाऱ्या पावसाचा ताळमेळ घालता आला नाही. म्हणूनच अनेकांना गावे सोडायला मी सांगितले. त्यामुळे जीवितहानी झाली. प्रचंड पाऊस पडतो, तेव्हा काहीच पर्याय नसतो. जेवढे पाणी खाली जाईल तेवढे चांगले. कर्नाटक सरकारशी आमचे बोलणे झाले असून त्यांनी देखील यासंदर्भात सहकार्य देखील केले आहे.