येत्या ४ ते ५ दिवसात होईल राज्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय; राजेश टोपेंनी दिले संकेत


मुंबई – येत्या ४ ते ५ दिवसात राज्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय होईल, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. शालेय शिक्षण विभाग आणि उच्च, तंत्र शिक्षण विभागांचा अहवाल टास्क फोर्सला प्राप्त झाल्यानंतर यासंदर्भातील पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकारने यापूर्वीच निर्णय घेतला होता. पण मुलांचे लसीकरण न झाल्यामुळे टास्क फोर्सच्या विरोधानंतर हा निर्णय तात्काळ स्थगित करण्यात आला. आता काय निर्णय होतो, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे.

आम्ही कॉलेज आणि शाळांच्या बाबतीत स्पष्ट उल्लेख केला आहे की, त्या दोन्ही विभागाने त्या संदर्भातील निर्णय घ्यायचा आहे. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत असतील, वर्षा गायकवाड असतील. या दोघांशी माझी चर्चा झाली आहे. त्या दोघांचे म्हणणे आहे की, टास्क फोर्सचे म्हणणे महत्त्वाचे आहे. चार-पाच दिवसात टास्क फोर्सचे अहवाल येतील. संबंधित विभाग चर्चा करतील आणि निर्णय घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

राज्यातील शाळा १७ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी केली होती. यामध्ये ग्रामीण भागात जिथे ८ वी ते १२वी याआधीच सुरू आहेत, तिथे ५वी ते ७वीचे वर्ग देखील सुरू करणे आणि नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगर पालिका या ठिकाणी रुग्णसंख्या आणि इतर अटींची पूर्तता करणाऱ्या भागांमध्ये ५वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले होते.

वर्षा गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिलासादायक चित्र निर्माण झाले होते. गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या शाळा कधी सुरू होणार याची उत्सुकता आता वाढू लागली आहे. पण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंधांमध्ये शिथिलता निर्माण करण्याबाबतच्या घोषणा करतानाच शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय टास्क फोर्सच्या बैठकीनंतर घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते.