‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’


राज्य शासनाने पीक पेरणी बाबतची माहिती गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: भ्रमणध्वनीवरील ॲपद्वारा उपलब्ध करून देण्याबाबतचा ‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रम टाटा ट्रस्टने विकसित केलेल्या आज्ञावलीचा वापर करून येत्या 15 ऑगस्टपासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

पीक पेरणी अहवालाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित होण्याच्यादृष्टीने आणि पीक विमा व पीक पाहणी दावे निकालात काढण्यासाठी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ही आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीत शेतकऱ्यांचा सहभाग असल्याने पारदर्शकता आणणे शक्य झाले आहे. या आज्ञावलीचा उपयोग पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मौजे.करंजपाडा येथे प्रायोगिक तत्वावर यशस्विरित्या करण्यात आला आला असून ई-पीक पाहणी प्रकल्पापूर्वी राज्यातील 20 तालुक्यांमध्ये या प्रकल्पाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे.

ई-पीक पाहणीद्वारे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन पीक पाहणीची जलद, वस्तूनिष्ठ आणि पारदर्शक पध्दतीने माहिती संकलित करण्यात येणार आहे.आणि तलाठ्यांचे काम सोपे होण्यास मदत होईल. ॲपच्या माध्यमातून अधिप्रमाणित रिअल टाइम डेटा उपलब्ध होणार आहे. मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे स्वत:च्या शेतातील उभ्या पिकांची माहिती, अक्षांश-रेखांश दर्शविणाऱ्या पिकांच्या छायाचित्रासह उपलब्ध होऊ शकेल. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरिता राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे.

ई-पीक पाहणीचे फायदे-
शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेच्या थेट लाभासाठी ई-पीक पाहणी प्रकल्पातील माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. गाव, तालुका, जिल्हा आणि विभाग निहाय पिकाखालील क्षेत्राची अचूक आकडेवारी सहज उपलब्ध होणार आहे. ठिबक आणि तुषार सिंचन योजनेसारख्या योजनांचा लाभ खातेधारकांना अचूकरित्या देणे शक्य होणार आहे.

खातेनिहाय आणि पीकनिहाय क्षेत्राची यादी उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्याकडून देय ठरणारा रोजगार हमी उपकर आणि शिक्षण कर निश्चित करता येईल. खातेदारनिहाय पीक पाहणीमुळे खातेदार निहाय पीक कर्ज देणे, पीक विमा भरणे किंवा पीक नुकसान भारपाई शक्य होणार आहे. कृषि गणना अत्यंत सुलभ पद्धतीने व अचूकरित्या करता येईल.

ई-पीक पाहणीचे टप्पे आणि कालावधी
ई-पीक पाहणी अंतर्गत खातेदाराची एकदाच नोंदणी करण्यात येईल. 15 सप्टेंबरपर्यंत हंगाम निहाय पिकाची माहिती अक्षांश-रेखांशासह काढलेल्या पिकाच्या छायाचित्रासह अपलोड करण्यात येईल. 16 ते 30 सप्टेंबर दरम्यान मोबाईल ॲपमधील माहितीची अचूकता पडताळून आणि आवश्यक असल्यास दुरूस्ती करून तलाठी ती कायम करतील. खातेनिहाय पिकांची माहिती संबंधित डिजिटल स्वाक्षरीत 7/12 मधील गाव नमुना नंबर 12 मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. 1 ऑक्टोबरपासून शेतकरी रब्बी हंगामाची पीक पाहणी अपलोड करू शकतात.

एका मोबाईलवरून 20 खातेदारांची नोंदणी करता येणार असल्याने एखाद्या शेतकऱ्याकडे स्वत:चा स्मार्टफोन नसल्यास उपलब्ध होणारा दुसरा र्स्माटफोन वापरता येईल. अल्पवयीन खातेदाराच्या बाबतीत त्याचे पालक नोंदणी करू शकतात. सामायिक खातेदार त्यांच्या वहीवाटीत असलेल्या क्षेत्रातील पिकांची स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील.

ई-पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांना विविध सुविधा आणि योजनांचा लाभ घेणे शक्य होणार असल्याने आणि ही प्रक्रीया पारदर्शक असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला यात सहभागी करून घेण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने आवश्यक प्रशिक्षणाला सुरूवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या प्रणालीची माहिती घेतल्यास येत्या काळात त्याला ई-पीक पाहणी उपयुक्त ठरू शकेल.