17 ऑगस्ट पासून राज्यातील सुरु होणाऱ्या शाळांचा निर्णय तूर्तास लांबणीवर


मुंबई : येत्या 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरु होणार होत्या. पण आता हा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशीरा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरु करायच्या की नाहीत यावर काल राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला टास्क फोर्सचे सदस्य, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि काही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये लहान मुलांच्या आरोग्य संदर्भात आणि शाळा सुरू करायच्या की नाही यावर चर्चा झाली.

कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या ग्रामीण भागांमध्ये नाही, अशा ठिकाणी शाळा सुरु राहतील, पण सरसकट शाळा सुरु करता येणार नसल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केल्यामुळे येत्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडलेला दिसतो.

इतर राज्यातील लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. लहान मुलांचे लसीकरण अथवा औषधेही उपलब्ध नसल्यामुळे लगेच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेऊ नये, असे टास्क फोर्सच्या तज्ञांनी सूचित केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय अंतिमतः घेतील. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिक्षण विभाग आणि टास्क फोर्स यांची बैठक पार पडेल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. पंजाबमधील एका गावात शाळा सुरु केल्यानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याची घटना घडल्यामुळे आम्ही विचारपूर्वक पाऊले टाकत असल्याचे राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

सध्या 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. उर्वरित वर्ग लवकरच सुरू होणार आहेत. 1 ऑगस्टला ब्रेक द चेन अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आले आहेत. मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोना महामारीमुळे बंद आहेत.