पालकमंत्री बच्चू कडू यांचेकडून आपोतीकर कुटुंबियांना चार लाख रुपयांच्या सानुग्रह मदतीचे अनुदानही सुपूर्द


अकोला – तालुक्यातील आपोती खु. येथील वीज पडून मृत्यू पावलेल्या आदित्य किसन आपोतीकर(वय-१७) यांच्या परिवाराला राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी भेट देऊन सात्वंन केले व चार लाख रुपयांचा सानुग्रह मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी पालकमंत्री कडू यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, तहसिलदार बळवंत अरखराव, ग्रामसेवक, तलाठी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी आपोतीकर कुटुंबियांचे सांत्वन केले, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची हमी दिली. तसेच कुटुंबास चार लक्ष रुपयांचे सानुग्रह अनुदानाचा धनादेश त्यांच्या सुपूर्द केला. यासोबतच राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय योजना, विद्यार्थी अपघात विमा योजना व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत सर्व लाभ देण्यात यावे, असे निर्देश दिले. अतिवृष्टीमुळे झालेली शेतीची नुकसान भरपाई व घरकूल योजनेचा लाभ प्रशासनाने प्राधान्याने मिळवून द्याव्या, अशा सुचनाही दिल्या.

नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबाला संकटाला सामोरे जावे लागते. या संकटात शासन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुटूंबाला आर्थिक हातभार लावता यावा व त्यांचे भविष्य सुरक्षित करावे यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ तसेच शक्य ती मदत देण्याकरीता शासन सतत प्रयत्नशील आहे,असे ना. कडू यांनी यावेळी सांगितले.