‘कोविड’मुळे पालक गमावलेल्या बालकांना शासकीय योजनांचे लाभ मिळवून द्यावेत – यशोमती ठाकूर


धुळे : कोरोना विषाणूमुळे पालक गमावलेल्या बालकांना आधार देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अशा बालकांना शासकीय योजनांचे लाभ तातडीने मिळवून द्यावेत. एवढेच नव्हे, तर या बालकांच्या नियमितपणे संपर्कात राहून त्यांच्या अडी- अडचणी जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

मंत्री ॲड. ठाकूर धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. चिमठाणे, ता. शिंदखेडा येथे जाण्यापूर्वी त्यांनी भोरखेडा ता. शिरपूर येथील अविनाश राजपूत यांच्या मुलांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. कोरोना विषाणूमुळे अविनाश राजपूत व त्यांच्या पत्नी रितू अविनाश राजपूत यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची दोन्ही मुले जयेश आणि हर्षवधन यांची मंत्री ॲड. ठाकूर यांनी भेट घेत मदत केली. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हेमंतराव भदाणे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल, प्रमोद कापडे उपस्थित होते.

मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, ‘कोविड’मुळे अनाथ झालेल्या बालकांचे शिक्षण, पोषण आणि त्यांची सुरक्षा महत्वाची आहे. अशा मुलांच्या मदतीसाठी शासन नेहमीच तत्पर राहील. या मुलांना शिधापत्रिकेसह शासनाचे विविध लाभ मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. या मुलांचे वेळोवेळी समुपदेशन करण्यात यावे. त्यांचे मालमत्तेबाबतचे प्रश्न तातडीने सोडवावेत. काही अडचणी असतील, तर थेट संपर्क साधावा, असे सांगत मंत्री ॲड. ठाकूर यांनी राजपूत भावंडांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.