डिजिटल इंडिया- इंटरनेट युजर संख्या ८२ कोटींवर

भारतात मार्च २०२१ पर्यंत सक्रीय इंटरनेट युजर्सची संख्या ८२ कोटींच्या पुढे गेली असून आत्तापर्यंत १,५७,३८३ ग्रामपंचायती हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेटने जोडल्या गेल्या आहेत. तृणमुलचे खासदार डेरेक यांनी राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना इलेक्ट्रोनिक व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली आहे.

सिस्कोच्या व्हिजुअल नेटवर्किंग इंडेक्स २०१७ च्या रिपोर्ट मध्ये भारतात २०२१ पर्यंत सक्रीय इंटरनेट युजर्सची संख्या ८२ कोटींवर जाईल असे म्हटले गेले होते. हा अंदाज खरा ठरला असून ट्रायच्या रिपोर्ट नुसार  ३१ मार्च २०२१ पर्यंत ८२.५३ कोटी इंटरनेटचे युजर्स आहेत. त्यात ग्रामीण भागातील युजर्स ३०.२ कोटी तर शहरी भागात ५०.०२ कोटी युजर्स आहेत.

ग्रामीण भागात सरकारने ग्रामपंचायती व गावात भारतनेट योजना लागू केली असून १ जुलै पासून १,५७,३८३ ग्रामपंचायती हायस्पीड इंटरनेट सेवेने जोडल्या गेल्या आहेत. यासाठी ५,२५,७०६ किमी लांबीची ऑप्टिक फायबर केबल घातली गेली आहे. अन्य एका रिपोर्ट नुसार २०२५ पर्यंत सक्रीय युजर्सच्या संख्येत ४५ टक्के वाढ होऊन ही संख्या ९० कोटींवर जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात युजर्स संख्या वाढण्याचा वेग अधिक असल्याचे दिसून येत आहे.