मुंबई लोकल संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचे मोठे विधान


नवी दिल्ली – कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेल्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कमी करत ठाकरे सरकारने जनतेला दिलासा दिला आहे. पण मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. अद्यापही सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद असल्यामुळे एकीकडे लोक नाराजी व्यक्त करत असताना दुसरीकडे विरोधकही टीका करत आहेत. दरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई लोकलसंदर्भात महत्वाचे विधान केले आहे.

राज्य सरकारने लोकलबाबत लोकांच्या मागण्यांचा विचार करावा. राज्य सरकार तयारी दाखवेल त्याक्षणी लोकलला परवानगी द्यायला तयार असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने आता निर्बंध शिथिल केल्याचा आधार घेत केंद्र सरकारला रेल्वे पूर्ववत सुरु करण्याची विनंती केली, तर आम्हाला काही अडचण नाही. जोपर्यंत राज्य आपली भूमिका जाहीर करत नाही, तोपर्यंत केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. कारण शेवटी राज्य कोरोना स्थिती हाताळत असल्याचे रावसाहेब दानवेंनी म्हटले आहे. राज्य सरकारने कोरोना स्थिती आटोक्यात आल्याचे सांगत रेल्वे वाहतूक सुरु करण्याची विनंती केल्यास आम्ही परवानगी देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.