पूरस्थिती मुंबईतच नव्हे, तर जगभर निर्माण होत आहे, तेथील महापालिका काही आमच्या ताब्यात नाही – मुख्यमंत्री


मुंबई – गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांना बसलेला पावसाचा जोरदार तडाखा असो किंवा मुंबईची पहिल्याच पावसाने झालेली तुंबई असो. पण विरोधकांनी या प्रकारामुळे सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सुरू केली आहे. विशेषत: मुंबईत दरवर्षीच्या पावसामुळे साचणाऱ्या पाण्यामुळे आणि निर्माण होणाऱ्या पूरसदृश्य स्थितीमुळे विरोधकांनी सरकारवर अनेकदा परखड शब्दांमध्ये टीका केल्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे. मुंबईप्रमाणेच जगभरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तिथल्या महापालिका आमच्या ताब्यात नाहीत, असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील एच पश्चिम विभागामधील वॉर्ड ऑफिसच्या इमारतीत झालेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी पालिका अधिकाऱ्यांचा आणि फ्रंटलाईन वर्कर्सचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या संकटाविषयी मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली.

मुंबईवर नैसर्गिक आपत्ती यायच्या त्या येतच आहेत. सध्या एक नवीन संकट आहे. काही दिवसांचा, काही महिन्यांचा पाऊस काही तासांत पडत आहे. पूरस्थिती मुंबईतच नाही, जगभर निर्माण होत आहे. तिथे तर महापालिका काही आमच्या ताब्यात नाहीत. बीजिंग किंवा जिथे कुठे जगभरात पूर आले, त्या महापालिका काही आमच्या ताब्यात नाहीत. पण तिथेही पूर आले. आता त्याला जबाबदार कोण? हे तिथे कोण असतील, ते बोलत असतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ही पुराची आपत्ती ज्या प्रमाणे आली, त्यावेळी स्थानिक प्रशासनाने ४ लाखांहून जास्त नागरिकांचे स्थलांतर केले, म्हणून सुदैवाने मोठी प्राणहानी टळली. दुर्दैवाने काही प्रमाणात तिथे प्राणहानी झाली. चिपळूण, महाड, सातारा, कोल्हापूर अशा ठिकाणी पूर आला. तिथे देखील मुंबई महानगरपालिकेने आपल्या टीम पाठवून तेथील नागरिकांना देखील मदत केली, असे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेली वास्तू १ मे पासूनच खुली झाली असून जुन्या वास्तूचे उद्घाटन केल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे. श्रेय घेण्याच्या नादात महापालिकेतील सत्ताधारी काय करुन दाखवतील याचा नेम नाही. या इमारती बाबत मुख्यमंत्र्यांना वास्तव माहिती न देता अशा प्रकारे कार्यक्रम करुन महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी स्वतःचे हसे तर केलेच सोबत मुख्यमंत्र्यांची फसगत केली आहे. हे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.