विजय वडेट्टीवारांचा ओबीसी आरक्षणावरुन भाजपवर पुन्हा घणाघात


मुंबई : राज्यातील राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर ढवळून निघत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधक भाजपमध्ये सातत्याने ओबीसी आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत असतात. अशातच आता पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणावरून मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाले हे भाजपचेच पाप असल्याचा घणाघात वडेट्टीवार यांनी केला आहे. जर भाजपने नीट भूमिका मांडली असती तर ओबीसींवर ही वेळ आली नसती असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी काम करत असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारमधील तीनही पक्ष काम करत आहेत. राज्य सरकारमार्फत आम्ही ओबीसींचा डेटा मिळवू आणि ओबीसी आरक्षण मिळवून देऊ, असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला.

दुसरीकडे राज्य सरकारने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पुरग्रस्तांसाठी मदत, दुरूस्ती आणि दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केले आहे. विरोधकांनी या पॅकेजवरून राज्य सरकारवर टीका केली. या टीकेला वडेट्टीवार यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. विरोधक त्यांची भूमिका पार पाडत आहेत. पण त्यांनी जाहीर केलेले पॅकेज आम्हालाही माहिती आहे. आपत्तीग्रस्तांसाठी रस्ते, वीज, या मूलभूत गोष्टींसाठी निधी दिला पाहिजे. त्या सर्वांचा या पॅकेजमध्ये समावेश आहे आणि राज्य सरकारने एक सर्वसमावेशक पॅकेज जाहीर केले असल्याचे विजय वडेट्टीवारांनी सांगितले आहे.