नवी दिल्ली – आज राजधानी दिल्लीत देशाचे गृहमंत्री आणि पहिले केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली, यासंदर्भातील माहिती शरद पवार यांनी देखील आपल्या ट्विटर अकांउंटवरून दिली आहे. ही भेट नेमकी कशासाठी घेतली, याविषयी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. त्यांच्यासोबत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे देखील उपस्थित होते. पण, आपल्या ट्विटमध्ये भेटीचे कारण शरद पवारांनी नमूद केले असले, तरी गेल्या काही दिवसांत शरद पवारांनी घेतलेल्या राजकीय भेटीच्या पार्श्वभूमीवर या भेटीमागे राजकीय संदर्भ असल्याचे तर्क महाराष्ट्रात काढले जात आहेत.
अमित शहांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर शरद पवारांचे ट्वीट; म्हणाले…
Had a brief meeting with Union Co-operation Minister Shri Amit Shah in New Delhi today along with Shri Jaiprakash Dandegaonkar,President of NFCSF (National Federation of Cooperative Sugar Factories Ltd) & Prakash Naiknavre to discuss issues faced by the sugar co-operative sector. pic.twitter.com/4jroaBrsGs
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 3, 2021
या भेटीविषयी शरद पवारांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सर्वप्रथम मी अमित शहा यांचे अभिनंदन केले. या भेटीदरम्यान, आम्ही देशातील साखर उद्योगाची परिस्थिती आणि साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यावर चर्चा केल्याचे शरद पवारांनी नमूद केले आहे.
We brought to his notice the two most emergent & severe issues like MSP & permissions to set up Ethanol manufacturing units within the premises of sugar mills. We hope that these issues would be favourably considered & resolved at the earliest by Hon’ble Co-operation Minister. pic.twitter.com/9XIE6shDqr
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 3, 2021
शरद पवार यांनी या ट्वीटसोबत अमित शहा यांना दिलेल्या पत्राची प्रत देखील शेअर केली आहे. साखर उद्योगाशी संबंधित दोन महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आम्ही अमित शहा यांचे लक्ष वेधले. यामध्ये साखरेला हमीभाव आणि साखर कारखान्यांच्या परिसरातच इथेनॉल मॅन्युफॅक्चरिंग युनिट बसवणे या गोष्टींचा समावेश आहे. आम्हाला आशा आहे की या समस्यांमध्ये तातडीने लक्ष घालून सहकार मंत्री त्या सोडवण्यासाठी पावले उचलतील, असे आपल्या ट्वीटमध्ये शरद पवार यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शरद पवार यांच्या या भेटीवरून राजकीय भाकित वर्तवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही. जसे लष्करी हल्ला किंवा माघार घेताना कव्हर फायर देतात, तोच प्रकार आपण आज पाहिला. नवाब मलिक यांची पत्रकार परिषद फक्त पवार-शहा भेटीला कव्हर-अप करण्यासाठी होती. बहुतेक ठाकरेंना दाखवायला की आम्ही भाजपविरुद्धच आहोत, असे ट्वीट अंजली दमानिया यांनी केले आहे.