आमदार समाधान अवताडे यांची पंढरपूरात कोरोना चाचणीशिवाय प्रवेश न देण्याची मागणी


पंढरपूर : पंढरपूर शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळे याठिकाणी बाधितादेखील मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत. असे असताना भाविकांची रोजची गर्दी वाढतच चालली असून व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनच्या संकेतामुळे मोठी धास्ती बसली आहे. आता नागरिक आणि व्यापाऱ्यांचे हाल टाळायचे असतील तर पंढरपूरमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी काही दिवस बंधनकारक करण्याची मागणी आमदार समाधान अवताडे यांनी केली आहे.

पंढरपूरमध्ये सध्या काही दिवसापासून रोज सरासरी 100 पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. यातच सध्या शहरात जवळपास 800 कोरोनाच्या वर रुग्णांवर उपचार सुरु असून काल केलेल्या तपासणीत नवीन 128 रुग्ण सापडल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.

पंढरपुरमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची वेळ येणार असल्यामुळे व्यापारी आता पासूनच आक्रमक झाले आहेत. गेल्या 26 महिन्यांपासून आर्थिक चक्र थांबले असताना आता आम्हाला 8 वाजेपर्यंत व्यापार करण्याची मोकळीक देण्याची मागणी ते करत आहेत. कोरोना व्यापाऱ्यांच्यामुळे नाही, तर बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे वाढत असल्याचा आरोप व्यापारी सत्यविजय मोहोळकर यांनी केला आहे. बँकांची कर्जे आणि त्याचे व्याज याच्या बोजाखाली व्यापारी दबून गेलेला असताना आता वीज बिले, नगरपालिका कर याच्या पैशासाठी जोरदार वसुली सुरु आहे. दुकाने बंद असताना कुठून पैसे आणायचा असा सवाल या व्यापाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान विठ्ठल मंदिर कोरोनाचे नियम पाळून उघडण्याची मागणी आता वारकरी संप्रदायाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. पंढरपूरचे अर्थचक्र गेल्या 26 महिन्यापासून मोडून गेले आहे. तसेच विठ्ठल मंदिर बंद असल्यामुळे वारकऱ्यांची मानसिक शक्तीचेही खच्चीकरण होत असल्यामुळे मंदिरे तातडीने उघड अशी मागणी समस्त वारकरी, फडकरी, दिंडीकरी समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर आणि किरण महाराज जाधव यांनी केली आहे.

सध्या प्रशासन वाढता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तपासण्यांचा वेग वाढवत असून लॉक डाऊनची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्याच्या तयारीला लागले आहे. पंढरपूरमध्ये सध्या रोज जवळपास 25 हजारापेक्षा जास्त भाविक येत असल्यामुळे आता कोरोना रोखण्यासाठी आधी या भाविकांवर निर्बंध घालायचे की त्यांची तपासणी करून त्यांना सोडायचे हा निर्णय पहिल्यांदा प्रशासनाला घ्यावा लागणार आहे. काही असले तरी पुन्हा एकदा तिसऱ्या लाटेपूर्वीच पंढरपूरची स्थिती मात्र पुन्हा गंभीर बनू लागली आहे.