लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन


मुंबई :- इंग्रज सरकारविरोधातल्या भारतीय असंतोषाचे जनक, देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे महान नेते लोकमान्य टिळक यांच्या 101 व्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले असून लोकमान्य टिळकांनी दिलेल्या स्वराज्याला, सुराज्यात परावर्तित करण्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प होऊया, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी लोकमान्य टिळकांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली आणि कृतज्ञता व्यक्त केली.

लोकमान्य टिळक यांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशावर दिडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रज सरकारविरोधात देशवासियांना एकजूट करण्याचे, स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी प्रेरीत करण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले. स्वराज्य हा भारतीयांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्यासाठी संघर्ष केला पाहिजे, हा विचार त्यांनी दिला. भारतीय स्वातंत्रलढ्याची आग धगधगती राहील याची काळजी घेतली.

त्यासाठी लोकचळवळ उभारली. कठोर तुरुंगवास भोगला. लोकमान्य टिळकांचे नेतृत्व आणि कोट्यवधी भारतवासियांच्या त्यागातून, संघर्षातून, बलिदानातून देशाला मिळालेले स्वातंत्र्य टिकवणं, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित राखणे, भारतीय लोकशाही आणि राज्यघटनेची मूल्ये समाजात खोलवर रुजवणे हीच, लोकमान्य टिळकांना खरी आदरांजली ठरणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

शेतकरी, कष्टकरी बांधवांच्या श्रमशक्तीवर जगाचा रहाटगाडा सुरु असल्याचा क्रांतीकारी विचार अण्णा भाऊ साठे यांनी दिला – उपमुख्यमंत्री अजित पवार
तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे कृतीशील साहित्यिक होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. आपल्या लेखणी, शाहिरीवाणीच्या बळावर संयुक्त महाराष्ट्राचा, गोवामुक्तीचा लढा यशस्वी करुन दाखवला. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र सामान्य माणसापर्यंत नेले. दुर्बल, वंचित, उपेक्षित समाजबांधवांचा वास्तववादी जीवनसंघर्ष साहित्यातून जगासमोर आणले. शेतकरी, कष्टकरी बांधवांच्या श्रमशक्तीवरच या जगाचा रहाटगाडा सुरु असल्याचा क्रांतिकारी विचार त्यांनी दिला. वास्तववादी, काळजाचा ठाव घेणाऱ्या अण्णा भाऊंच्या लेखणीनं, शाहिरीनं महाराष्ट्राचं साहित्यिक, सांस्कृतिक विश्व खऱ्या अर्थानं समृद्ध केले.

कथा, नाटक, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवासवर्णन असे साहित्यातले प्रकार त्यांनी लीलया हाताळले. औपचारिक शिक्षण नसताना, केवळ अक्षरओळख असलेल्या अण्णा भाऊंचे साहित्य आज अनेक विद्यापीठांमध्ये अभ्यासले जाते. त्यांच्या नावाने विद्यापीठांमध्ये अध्यासन स्थापन करण्यात आले आहे. हा अण्णा भाऊंच्या कार्याचा, विचारांचा गौरव आहे. मी अण्णा भाऊंच्या अलौकिक कार्याबद्दल, राष्ट्र व लोकसेवबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. लोकशाहीर अण्णाभाऊंना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचे स्मरण करुन विनम्र अभिवादन केले.