16 हजार पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू पुरवणार राष्ट्रवादी काँग्रेस


मुंबई : राज्याचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून लवकरच राज्य सरकार मदतीची घोषणा करेल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांचे जास्त नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले. या पूर परिस्थितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम मदत जाहीर करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांनी महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुंबईतील राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. शरद पवारांसोबत यावेळी पत्रकार परिषदेला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, नवाब मलिक, राजेंद्र शिंगणे, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, शशिकांत शिंदे आदी नेते उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार बोलताना म्हणाले की, राज्यातील सहा ते सात जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले आहे. सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, कोल्हापूर, रायगड अशा एकूण सात जिल्ह्यांसहित अन्य जिल्ह्यातही नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्याची गरज आहे. राज्य सरकार पूरस्थिती अहवाल आल्यानंतर अंतिम धोरण जाहीर करुन जबाबदारी घेईल. तसेच पुढे बोलताना माळीणमध्येही अशीच अवस्था झाली होती. सरकार आणि स्थानिक नेत्यांच्या मदतीने माळीणला पुन्हा उभे करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

राज्यात 16 हजार कुटुंब उद्भवलेल्या पुरामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. तर चिपळूण, खेडमधील पाच हजार, महाडमधील पाच हजार, कोल्हापुरातील दोन हजार, साताऱ्यामधील एक हजार आणि सांगलीतील दोन हजार लोकांना फटका बसल्याची माहिती शरद पवार यांनी बोलताना दिली. पुढे बोलताना, पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भांडी, कपडे, अंथरुण अशा जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येईल. याशिवाय वैद्यकीय पथके पाठवली जातील. येत्या दोन ते तीन दिवसांत ही मदत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले.

दरम्यान राज्यातील नेत्यांना पूरग्रस्त भागांचा दौरा न करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बोलताना केले. ते म्हणाले की, पूरग्रस्त भागांत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गेलेच पाहिजे. नेमकी वस्तूस्थिती काय आहे? याचा आढावा त्यांनी घेतलाच पाहिजे. पण इतरांनी जाऊ नये. मी गेलो, तर यंत्रणेतील लोक माझ्याभोवती जमा होतील. यामुळे ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांच्यावरुन लक्ष विचलित होईल.