शरद पवारांच्या दौरे न करण्याच्या सल्ल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया


मुंबई – राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक राजकीय नेते या परिस्थितीची पाहणी करण्याकरिता दौरे करत आहेत. अशातच राजकीय नेत्यांना अशा भागामध्ये दौरे न करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनाशी आपण सहमत असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले, जे काही आवाहन शरद पवार यांनी केले आहे, त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की, दौरे करताना दौरे करणाऱ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की त्यांच्या दौऱ्याचा ताण हा शासकीय यंत्रणेवर येऊ नये. मी तर विरोधी पक्षनेता आहे. आम्ही जातो तेव्हा शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच. कारण सरकारने तसा जीआरच काढलेला आहे. पण आमचे दौरे यासाठी गरजेचे आहेत की, आम्ही गेलो तर शासकीय यंत्रणा जागी होते. आम्ही गेल्यामुळे कुठेतरी शासकीय यंत्रणा कामाला लागते.

पुढे फडणवीस म्हणाले, सगळ्यात महत्वाचे म्हणजे जो लोकांचा आक्रोश आहे, तो आम्हाला समजून घेता येतो आणि तो सरकारपुढे मांडता येतो. त्यामुळे शरद पवार यांच्या आवाहनाचा एवढाच अर्थ घेतला पाहिजे की, रेस्क्यू ऑपरेशन किंवा मदतकार्य आपल्यामुळे थांबता कामा नये. त्यामुळे त्यांचे म्हणणं बरोबर आहे. पण विरोधी पक्षनेता म्हणून जो काही दौरा आहे, तो मी येत्या 3 दिवसांत करणारच आहे.

दरम्यान, मुंबई भाजप आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज कोकणात काही जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली. त्यात घरगुती वापराच्या वस्तू, सॅनिटरी पॅडपासून सगळे काही असल्याचे त्यांनी सांगितले.