राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना दहा हजारांची रोख मदत, पाच हजारांचे धान्य; विजय वडेट्टीवार यांची माहिती


मुंबई – राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून घरात पाणी शिरलेल्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचे जाहीर केल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तसेच, अन्नधान्यांचे नुकसान झालेल्यांना पाच हजार रुपयांची तात्काळ मदत देण्यात येणार आहे. पूरग्रस्तांच्या खात्यात प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची मदत जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जी घरे पुरामध्ये गेली किंवा घरात पुराचे पाणी शिरले आहे, त्या सगळ्या ठिकाणी सर्व कुटुंबास दहा हजार रुपये नगदी रुपाने व पाच हजार धान्य रुपाने ही मदत देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे व मदत देणार आहोतच, असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.

याशिवाय पूर्णपणे जी घर पडली असेल त्याला देखील मदत दिली जाणार आहे. ज्यांचा मृत्यू झाला असेल, त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली आहे. यातील एक लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून व चार लाख रुपये एसडीआरएफमधून, असे संपूर्ण पाच लाख रुपये महाराष्ट्र सरकारकडून संबंधित कुटुंबास दिले जाईल, असे देखील विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

तर, सरकार म्हणून जे काही करणं आवश्यक आहे ते आम्ही करू, नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत केली जाईल. मदत पुरवठा होताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ देणार नाही. जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना तशा सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. एकदा संपूर्ण आढावा आला की, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणचा सगळा एकत्रित आढावा घेऊन आर्थिक मदत देखील दिली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केले होते. चिपळूण येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली व यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

राज्यातील पूरपरिस्थितीतील नुकसानीचा आर्थिक आढावा दोन-चार दिवसांमध्ये घेण्यात येईल, पण आत्ता लगेच तातडीची मदत म्हणून अन्न, औषध, कपडेलत्ते व इतर आवश्यक गोष्टी पूरग्रस्तांना तात्काळ देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत. केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही. राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन, त्यानंतरच नुकसानभरपाई संदर्भामध्ये जाहीर करण्यात येईल, तसेच केंद्राकडूनदेखील काय आणि किती मदत मागायची ते ठरवता येईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत बोलून दाखवले होते.