लसीकरणाचा असा विक्रम करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य


मुंबई – सध्या भूस्खलन, महापूर अशा नैसर्गिक आपत्तींशी महाराष्ट्र झगडत आहे. यात काहींनी जीव गमावला, तर काहींनी जीवापाड प्रेम असलेली माणसे. राज्यात दुःखाचे, काळजीचे वातावरण असले तरी त्यात आता एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या राज्यात आता एक कोटींहूनही अधिक झाली आहे. महाराष्ट्र हे अशा प्रकारचा विक्रम करणारे पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे.

महाराष्ट्रात कोरोना विरुद्धच्या लढाईत एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले असून संपूर्ण देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने आज स्वत:च्या नावावर नोंदविला. दोन्ही डोस देऊन कोरोनापासून एक कोटीहून अधिक नागरिकांचे संरक्षण करण्याकामी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करत नागरिकांचे आणि प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.

राज्यात आज सायंकाळी चार वाजेपर्यंत सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी 64 हजार 308 एवढी झाली आहे. लसीकरणामध्ये नवनवीन विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविले जात आहे. आतापर्यंत राज्यातील तीन कोटी 16 लाख 9 हजार 227 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर आज सुरु असलेल्या लसीकरणामुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटीचा टप्पा पार झाला, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले. राज्यात आज सुमारे 4100 लसीकरण केंद्र सुरु असून त्याद्वारे सायंकाळी 4 वाजेपर्यंत तीन लाख 75 हजार 974 नागरिकांचे लसीकरण झाले. संध्याकाळी उशीरापर्यंत या संख्येत वाढ होऊ शकते, असे डॉ.व्यास यांनी सांगितले.