चिपळूणमधील स्थिती सुरळीत होण्यासाठी युद्धपातळीवर पुनर्वसन कार्य सुरू


रत्नागिरी :- चिपळुणातील परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी युद्धपातळीवर पुनर्वसनाचे काम सुरू करण्यात आले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत स्वतः चिपळून येथे तळ ठोकून या कामाबाबत सर्वांना मार्गदर्शन करीत आहेत. चिपळूणमधील पाणी ओसरत आहे, परंतु पूर्ण शहरामध्ये चिखल साचला आहे. ते काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

सर्वांना जेवणाची पॅकेट, सुके खाद्यपदार्थ व पाणी देण्यात येत आहे.यासाठी वेगवेगळ्या टीम काम करत आहे. इलेक्ट्रिसिटी व मोबाईल टॉवर सुरू केले जात आहेत. चिपळुणातील सर्व नागरिक आपल्या परीने मदत कार्यामध्ये काम करत आहेत. व्यावसायिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी कालच इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधीची रत्नागिरी येथे बैठक घेऊन त्यांना ताबडतोब सर्वेक्षण करून माणुसकीच्या दृष्टीने मदत करण्यासाठी मंत्री महोदयांनी त्यांना सक्त सूचना केल्या आहे.

येत्या काही दिवसात सर्व काही सुरळीत सुरु होईल अशी अपेक्षा आहे. मंत्रीमहोदय उदय सामंत हे चिपळूण येथे NDRF, कोस्टलगार्ड, Indian Navy, इंडियन आर्मी व स्थानिक प्रशासन यांच्याशी समन्वय साधून दिवसरात्र मदत करत आहेत. तसेच गेले तीन दिवस ते चिपळूण येथे मुक्काम ठोकून आहेत. ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत सतत संपर्कात आहेत. लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री चिपळूणला भेट देणार आहेत.