बच्चू कडू यांचे पूर परिस्थिती निर्माण होणार नाही याकरीता उपाययोजना राबवण्याचे निर्देश


अकोला – जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोर्णा नदीला पूर येवून नदीकाठच्या गावांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. पूरग्रस्त भागातील खडकी, हरिहर पेठ, शिवसेना वसाहत हे भाग व रिधोरा ता. बाळापूर, चांगेफळ व सुकळी या गावांना भेटी देऊन पाहणी केली. नुकसानग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधून दिलासा दिला. भविष्यात पूर परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी उपाययोजना राबवाव्या व मोर्णा नदीचे खोलीकरण करावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले. जिल्ह्यातील नदीकाठावरील व पूराबाधीत भागाची पाहणी केली.

पुरामुळे नदीकाठच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त भागातील नागरिकांचे समस्या जाणून त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले. तसेच पाहणी दरम्यान पालकमंत्री बच्चू कडू यांनी निर्देश दिले की, पूरग्रस्त भागात रोगराईचा फैलाव होवू नये याकरीता फवारणी तथा आवश्यक उपाययोजना करा. अतिवृष्टीमुळे मोर्णा नदीला पुन्हा पूर येऊ नये याकरिता जिल्हा लगत असलेल्या नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करा.

यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यावेळी दिले. अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे व पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे ड्रोनव्दारे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करा. मदतीपासून कोणीही वंचित राहता कामा नये या करीता प्रशासनाने प्राधान्याने कामे करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी दिले.