पहिली ते बारावी वर्गाच्या अभ्यासक्रमात होणार 25 टक्क्यांची कपात; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती


मुंबई – देशासह राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कायम असल्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत शाळांनी विद्यार्थांचे ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे, पण ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा असल्यामुळेच गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील विद्यार्थ्याना संकटाला सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशातील शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे. राज्यात देखील ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादांमुळे गेल्यावर्षी अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यावर्षीही शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पध्दतीने सुरु झाले आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तसेच शिक्षक व पालक संघटनेने केलेल्या मागणीचा विचार करून यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाने 25% अभ्यासक्रम कमी करून विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे.

दरम्यान शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी इयत्ता पहिली ते 12 वी पर्यंतचा 25% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती दिली आहे.