मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शुभेच्छा


मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे संकट रोखण्यासाठी हा सण घरीच राहून साजरा करा, यातून आपले कुटुंबीय आणि परस्परांची काळजी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले आहे. ‘ईद-उल-अजहा’ त्याग, समर्पणाचा संदेश देणारा आहे. त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्परांविषयी आदर बाळगूया,’ असेही मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे.

‘बकरी ईद’ निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
तसेच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना ‘बकरी ईद’ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बकरी ईद’ हा पवित्र सण श्रद्धा, प्रेम, बंधुभाव व त्यागाचा संदेश देतो. हा सण साजरा करताना सेवाकार्य तसेच उपेक्षित जनसामान्यांच्या कल्याणाचा विचार केला जातो, ही अतिशय समाधानाची बाब आहे. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत सर्वांनीच गोरगरीब बांधवांच्या हिताचा विचार करणे आवश्यक झाले आहे. बकरी ईदनिमित्त मी राज्यातील सर्व लोकांना विशेषतः मुस्लिम बंधू – भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा
त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम बांधवांना ‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. शांती आणि त्यागाचे प्रतिक असलेली ‘बकरी ईद’ सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात एकता, बंधुता, सौहार्द वाढीस लागो, यंदाची बकरी ईद राज्यावरचं कोरोना संकट दूर करणारी ठरो, अशा शुभेच्छा देतानाच उपमुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचे संकट संपल्यानंतर ‘बकरी ईद’सह सर्व सण पूर्वीप्रमाणे उत्साहात, आनंदात, सर्वांना सोबत घेऊन साजरे करु शकू, असा विश्वासदेखील उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.