इंडियन मेडिकल असोसिएशनचा इशारा; कोरोना नियमांमध्ये दिलेल्या सवलती मागे घ्या, अन्यथा सर्वोच्च न्यायालयात जाऊ


नवी दिल्ली – केरळ सरकारविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिशनने दिला आहे. केरळ सरकारने ‘बकरी ईद’च्या कालावधीमध्ये कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत नियमांमध्ये सूट दिल्यास परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते, असे आयएमएचे म्हणणे आहे. केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असतानाही सरकारने दिलेली निर्बंधांमधील सूट चिंताजनक असल्याचे मत देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था असणाऱ्या आयएमएने व्यक्त केले आहे. ही सूट दिल्यामुळे राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होण्याची चिन्ह असल्याचे संकेत एमआयएने दिले आहेत.

कोरोना बाधितांची संख्या राज्यामध्ये वाटत असतानाच लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये केरळ सरकारने सूट दिली आहे. ही सूट बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर देण्यात आल्याचे पाहून एमआयएला चिंता वाटत आहे. वैद्यकीय आपातकालीन परिस्थितीमध्ये अशाप्रकारची सूट देणे, हे अयोग्य आणि अनावश्यक असल्याचे रविवारी आयएमएने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. या पत्रकामध्ये आयएएमने केरळ सरकारचा निर्णय हा दुर्देवी असल्याचे म्हटले असून यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोक एकत्र येतील, अशी भीतीही व्यक्त केली आहे.

देशाचे आणि मानवतेचे भले व्हावे या मताने तसेच जबाबदारीचे भान राहून आयएमएकडून केरळ सरकारला विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपले आदेश मागे घ्यावेत. तसेच त्यांनी कोव्हिड अ‍ॅप्रोप्रिएट बिहेव्हियर (कोरोना नियमांसंदर्भातील अंमलबजावणी) न कणाऱ्यांविरोधात झिरो टॉलरन्स (दया, माया न दाखवता कारवाई) धोरण स्वीकारावे. केरळ सरकारने राज्य आणि पर्यायाने देश सुरक्षित ठेवण्याच्या आपल्या उद्दीष्टांपासून विचलित होऊ नये, असे आयएमएने आपल्या पत्रात म्हटले आहे. तसेच केरळ सरकारने निर्णय रद्द करत कोव्हिड अ‍ॅप्रोप्रिएट बिहेव्हियरचे पालन करण्याला चालना दिली नाही आणि कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासंदर्भातील उपाय केले नाहीत, तर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही आयएमएने दिला आहे.

शुक्रवारी केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी कोरोनासंदर्भातील नवीन नियमांची घोषणा केली. नवीन नियमांची घोषणा बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरच करण्यात आली आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ट्रील लॉकडाऊनच्या परिसरातील दुकाने खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. बकरी ईदनिमित्त जास्तीत जास्त ४० जणांना एका जागी जमण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण या ४० जणांनी लसीचा किमान एक डोस घेणे बंधनकारक आहे. केरळ सरकारने १८,१९,२० तारखेची सूट वगळता विकेण्ड लॉकडाउन सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बकरी ईद २० तारखेला आहे. या नवीन नियमांमुळे वाद निर्माण झाला असून अनेकांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली असतानाच त्यामध्ये आता इंडियन मेडिकल असोसिशनची देखील भर पडली आहे.